म. टा. प्रतिनिधी, पुणे
'सगळ्या क्षेत्रात जसे राजकारण आहे, तसे ते चित्रपटसृष्टीतही आहे. इथे काही गट तयार झाले आहेत, ज्यांचे चित्रपटसृष्टीवर वर्चस्व आहे. मी यातील कोणत्याच गटाची सदस्य नसल्याने मला त्यांच्यातील राजकारणाचा मोठा फटका बसला असून अजूनही बसतो आहे,' अशी खंत व्यक्त करून अभिनेत्री श्रुती मराठे हिने चित्रपटसृष्टीत चालणाऱ्या राजकारणावर टिपण्णी केली.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या 'सांस्कृतिक कट्ट्या'अंतर्गत आयोजित वार्तालापात श्रुतीने तिची अभिनय क्षेत्रातील कारकिर्द उलगडत वेगवेगळ्या विषयांवर आपली परखड मते मांडली. चित्रपट, मालिका, नाटक आणि वेबसीरीज या माध्यमांमध्ये काम करताना येत असलेल्या अनुभवांविषयीही तिने मनमोकळ्या गप्पा मारल्या. पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी आणि सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे उपस्थित होते.
श्रुती म्हणाली, 'कलाकारांमध्ये राजकारण होत नाही, ही बाब खरी नाही. याउलट चित्रपटसृष्टीत मोठ्याप्रमाणावर गटातटाचे राजकारण चालते. तुम्ही विशिष्ट गटाचे बनून राहिला नाहीत तर मागे पाडण्याचे प्रयत्न केले जातात. माझ्याबाबतीत हीच गोष्ट सातत्याने घडत आली आहे. ही गोष्टी अत्यंत चुकीची असून तुम्ही कोणत्या गटाचे आहात, यापेक्षाही तुम्ही किती चांगले कलाकार आहात, यावर कलाक्षेत्रात कामे मिळायला हवीत.' अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही तिने परखड भूमिका मांडली. 'आपल्याला जे म्हणायचे आहे, ते म्हणू दिले जात नाही. सध्याच्या काळ हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणारा आहे,' याकडे तिने लक्ष वेधले. 'सध्या नव्याने कलाविश्वात दाखल झालेल्या वेब सिरीज या माध्यमात प्रत्येकाला काम करावेसे वाटणे साहजिक आहे, कारण तिथे तुमच्या दिसण्यापेक्षाही तुमच्या अभिनयाकडे अधिक लक्ष दिले जाते,' असे सांगून श्रुतीने वेब माध्यमाची पाठराखण केली.
.
नाटक लोकांपर्यंत पोहोचायला हवे
'कोणतेही नाटक आजच्या काळात प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी कमी पडते. ते अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचायला हवे. अनेक नाटके सुरू होतात आणि काही प्रयोग होऊन बंद पडतात. चांगली संहिता, दिग्दर्शन आणि सादरीकरण असूनही असे का घडते, याबाबत नाट्यसृष्टीने विचार करायला हवा,' असे मत श्रुतीने मांडले. 'नाटक असेल किंवा वेबसिरीज जिथे जिथे अभिनयाला वाव मिळतो अशा सगळ्याच माध्यमांमध्ये मला काम करायला आवडते,' याकडेही तिने लक्ष वेधले.