म. टा. प्रतिनिधी, पुणे
'महाराष्ट्र राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा यंदाचा निकाल म्हणजे गेल्या १० वर्षांत वाढलेली मार्कांची सूज कमी होऊन आलेला निकाल आहे, विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये,' असे स्पष्ट मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन केले पाहिजे. त्यामुळे त्या विद्यार्थ्याला गुणवत्तेच्या आधारावर दहावीतच योग्य दिशा मिळू शकेल. पुढचे टप्पे गाठून, पदवीधर होत 'बेरोजगारांच्या कारखान्यात' दाखल होण्यापेक्षा दहावीच्या निकालात विद्यार्थ्याला त्याची गुणवत्ता कळली, तर तो विद्यार्थी त्या पद्धतीचे करिअर निवडू शकतो,' असेही तावडे यांनी सांगितले.
राज्याच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १२.३१ टक्क्यांनी घसरून ७७.१० टक्के इतका लागला. त्यावर दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होत्या. त्यामुळे तावडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
'२००७ पर्यंत २० मार्कांचे अंतर्गत गुण देण्याची पद्धत नव्हती. २००८ पासून अंतर्गत मूल्यमापनासाठी २० गुण देण्याची पद्धत सुरू झाली. ही पद्धत २०१८ पर्यंत सुरू होती. गेल्या वर्षापासून ती थांबवण्यात आली. २००७ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाचे गुण देण्याची पद्धत नव्हती. त्या वेळी शालान्त परीक्षेचा निकाल ७८ टक्के लागला होता आणि त्यानंतर ही पद्धत २००८ मध्ये सुरू झाली, त्या वेळी शालान्त परीक्षेचा निकाल नऊ टक्के वाढून, ८७.४१ टक्के इतका लागला. ती सूज आज खऱ्या अर्थाने उतरली,' असे तावडे म्हणाले.
'मंडळातर्फे लगेचच दहावीच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाते. या फेरपरीक्षेसाठी महिन्याभरात चांगला अभ्यास केला, तर स्वाभाविकपणे फेरपरीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षण घेऊ शकतील. अन्यथा विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास अभ्यासक्रमाची व्यवस्थाही आहे. कौशल्याआधारे विद्यार्थी शिक्षित झाला, तर तो आयुष्यात यशस्वी होऊ शकतो,' असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
२०१८-१९ मधील अकरावी ऑनलाइन प्रवेशाची विविध बोर्डाची आकडेवारी पाहता, अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रवेशाची संख्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे यंदा दहावीच्या निकालात कमी गुण मिळाले; म्हणून निराश होण्याचे कारण नाही.
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री