म. टा. प्रतिनिधी, पुणे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) राज्यव्यापी अधिवेशन येत्या रविवारी (२७ मे) पुण्यात होणार आहे. या अधिवेशनात राज्यभरातून मातंग समाजाचे १५ हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती आरपीआयच्या मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांनी दिली.
पुण्यातील एसएसपीएमएस मैदानावर आरपीआयच्या राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पक्षाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष एम. डी. शेवाळे, महापालिकेचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, मातंग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णा वायदंडे, मातंग आघाडी मुंबई विभागाचे अध्यक्ष नंदकुमार साठे, कोकण विभागाचे अध्यक्ष तुषार कांबळे, पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख संजय लोखंडे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख नाना पंडित, शहराध्यक्ष संदीप गायकवाड, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष धीरज सकट, जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे आदी या वेळी उपस्थित होते. अधिवेशनात दादर येथील गोल्ड मिलच्या सात एकर जागेवर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभारावे, मातंग समाजाच्या विकासासाठी लहुजी आयोगाच्या शिफारशी तत्काळ लागू कराव्या, पुण्यात संगमवाडी येथे लहुजी वस्ताद साळवेंच्या स्मारकाचे काम तातडीने सुरू करावे, असे ठराव संमत करण्यात येतील, असे हनुमंत साठे यांनी सांगितले.