म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य सरकारने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी (एसआरए) उंचीचे बंधन शिथिल करण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्याचा पुनर्विचार करून ३० मीटरपर्यंतचे उंचीचे बंधन कायम ठेवले जावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भातील निवेदन दिले जाणार आहे.
राज्य सरकारने 'एसआरए'बाबत नुकतीच नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीमध्ये एसआरए इमारतींसाठी यापूर्वीचे ३० मीटर उंचीचे बंधन काढून टाकण्यात आले असून, शंभर मीटरपर्यंत या इमारती उभ्या राहू शकतील, अशी तरतूद केली आहे. मात्र, या तरतुदीचा त्रास झोपडपट्टीतून एसआरए इमारतीत राहायला जाणाऱ्या नागरिकांनाच सहन करावा लागणार असून, उंचीचे बंधन कायम ठेवण्यात यावे, अशी आग्रही मागणी शिंदे यांनी केली आहे. 'एसआरए'ची इमारत तयार झाल्यानंतर कालांतराने तेथील लिफ्टची देखभाल आणि पाण्याच्या टाकीचे प्रश्न निर्माण होतात. अनेकदा वयोवृद्ध किंवा इतर आजारी नागरिकांना अशा इमारतींमधून वर-खाली करणे शक्य होत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. एसआरए इमारतींवरील उंचीचे बंधन काढून टाकल्यास आडव्या झोपडपट्टीचे रूपांतर उभ्या झोपडपट्टीत होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
.............