म. टा. प्रतिनिधी, पुणे
तीव्र उन्हाच्या झळांनी अवघ्या राज्याला घाम फुटला आहे. गुरुवारी मुंबई-कोकण तसेच महाबळेश्वर वगळता सर्वत्र कमाल तापमान ४० अंशांपेक्षा अधिक नोंदले गेले. तर पुण्यात पारा ४१.६ अंशांवर पोहोचला असून, राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला येथे (४६.३) झाली आहे. पुढील दोन दिवसांत राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने वाढता पारा राज्याची डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे.
शुक्रवारपासून (२६ एप्रिल) विदर्भात काही ठिकाणी; तर उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ही लाट किमान दोन दिवस कायम राहील, असेही हवामान विभागाच्या अंदाजात म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्यात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ नोंदली गेली. तर मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या उर्वरित भागात किंचित वाढ झाल्यामुळे वाढता उकाडा नागरिकांना आता असह्य होऊ लागला आहे. गुरुवारी महाबळेश्वर येथे ३३.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. त्याशिवाय पश्चिम मध्य महाराष्ट्रात सर्वत्र पारा ४० अंशांवर होता. मुंबई, कोकण पट्ट्यातील कमाल तापमान ३२ ते ३४.८ अंशांदरम्यान होते. त्याव्यतिरिक्त संपूर्ण राज्यात पारा ४० अंशांवर राहिला. मराठवाड्यातील पारा ४२ अंशांपुढे; तर विदर्भातील पारा ३९.८ अंशांपुढे नोंदला गेला.
हवामान विभागाच्या निकषांनुसार एखाद्या ठिकाणी कमाल तापमानामध्ये सरासरीपेक्षा पाच अंशांनी वाढ झाल्यास त्या भागात उष्णतेची लाट असल्याचे समजण्यात येते. गुरुवारी राज्यात अनेक ठिकाणी तापमानात मोठी वाढ झाल्याने उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती असली, तरी प्रत्यक्षात राज्यात कोठेही उष्णतेची लाट नव्हती. असे असले, तरी शुक्रवारी राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पुढील दोन दिवस उन्हाची तीव्रता कायम राहणार आहे. येत्या दोन दिवसांत कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. तर रविवार-सोमवारी राज्यातील कोकणपट्ट्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील.
राज्यातील प्रमुख शहरांचे
कमाल तापमान
(अंश-सेल्सिअस)
पुणे ४१.६
नगर ४३.४
जळगाव ४३
कोल्हापूर ४०.७
महाबळेश्वर ३३.४
मालेगाव ४२.६
नाशिक ४०.५
सांगली ४१.२
सातारा ४०.२
सोलापूर ४२.८
मुंबई ३२.५
सांताक्रूझ ३४.८
अलिबाग ३१.८
रत्नागिरी ३३.६
डहाणू ३४.५
उस्मानाबाद ४२.१
औरंगाबाद ४२.५
परभणी ४५
अकोला ४६.३
अमरावती ४५
बुलढाणा ४२.५
ब्रह्मपुरी ४५.५
चंद्रपूर ४५.४
गोंदिया ३९.८
नागपूर ४४.३
वर्धा ४५.५
यवतमाळ ४४.५
अकोला ४६.३