लूटमारी केल्याचा बनाव बारा तासांतच उघड
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
सोन्याची चार किलो ९०० ग्रॅम वजनाची बिस्किटे चोरट्यांनी प्रवासात चाकूच्या धाकाने लुटून नेल्याची तक्रार करणाऱ्या कामगारानेच ही चोरी केल्याचे उघड झाले आहे. गुन्हे शाखा आणि विभाग तीनच्या विशेष पथकाने संयुक्त तपास करून अवघ्या बारा तासांच्या आतच नेमका प्रकार उघड केला. रात्री उशिरापर्यंत सोने हस्तगत करण्याचे काम सुरू होते.
बेहराराम शांताराम पुरोहित (३१, रा. टिंबर मार्केट पुणे, मूळगाव सिल्दर, राजस्थान) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुरोहितनेच लुटीचा बनाव करून हिंजवडी पोलिस ठाण्यात (२९ मार्च) फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार पेठ पुणे येथील समृद्धी ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात डिलिव्हरी बॉय म्हणून पुरोहित काम करतो. बुधवारी (२८ मार्च) रात्री तिघा चोरट्यांनी एक कोटी ३५ लाख ६३ हजारांचे सोने चाकूच्या धाकाने लुटून नेल्याचे पुरोहित याने चार ते पाच तासानंतर हिंजवडी पोलिसांना येऊन सांगितले. मध्यरात्री महाळुंगे-बालेवाडी स्टेडियम जवळ ही घटना घडल्याचे तो सांगत होता.
समृद्धी पेढीचे मालक अरविंद चोप्रा यांनी पुरोहितला मुंबईतील जव्हेरी बाजारातील अरिहंत ज्वेलर्स आणि नम्रता ज्वेलर्स या दुकानांमधून १०० ग्रॅम वजनाची ४५ सोन्याची बिस्किटे घेऊन येण्यास सांगितले होते. त्याने ही बिस्किटे तेथून घेतली मात्र, ती मुंबईतच ठेवली. मात्र, हिंजवडी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत त्याने लुटीचा बनाव केला. सोने पुण्याकडे घेऊन येताना बालेवाडी स्टेडियमजवळ शेअर कारमधून उतरून टिंबर मार्केटकडे जाण्यासाठी रिक्षात बसलो. रिक्षामध्ये अन्य दोघे बसले होते. त्या दोघांनी चाकूचा धाक दाखवून ४५ सोन्याची बिस्किटे, रोख रक्कम आणि मोबाइल असा ऐवज लुटला, अशी कहाणी त्याने पोलिसांना सांगितली. पुरोहितच्या त्याच्या सांगण्यातील तफावत आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने तो खोटे बोलत असल्याचे पोलिसांनी ओळखले.
पोलिस उपायुक्त परिमंडळ तीनचे विशेष पथक, हिंजवडी पोलिस, गुन्हे शाखा, गुन्हे शाखा युनिट एक यांच्या संयुक्त तपासात सायंकाळी संपूर्ण प्रकार उघड झाला. दुपारीच पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले. या पथकाकडून रात्री उशिरापर्यंत चार किलो ९०० ग्रॅम वजनाचे सोने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होती. हे सोने पुरोहित याने कोणाकडे ठेवले, त्याचे इतर साथीदार कोण आहेत, हे करण्यामागे त्याचा उद्देश काय होता, हे सोने हस्तगत झाल्यावरच स्पष्ट होणार आहे. काही दिवसांपूर्वी पुरोहित याने सराफी पेढीतील नोकरी सोडली होती. त्यानंतर तो पुन्हा कामावर आला होता.
-----------