म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
'हल्ली समाजात घटस्फोटाचे प्रमाण वाढत असल्यामुळे मैत्री, प्रेम आणि लग्न यामध्ये फरक असल्याची जाणीव मुलामुलींनी ठेवावी,' असे आवाहन पुणे कौटुंबिक न्यायालयाच्या ज्येष्ठ समुपदेशक स्मिता जोशी यांनी केले.
चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा वाणिज्य आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या वतीने दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. त्या वेळी समुपदेशन विषयावर जोशी यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने उपक्रमाचे उद्घाटन झाले.
हल्ली समाजात लग्नानंतर घटस्फोटाचे प्रमाण वाढले असल्याचे नमूद करून जोशी म्हणाल्या, 'घटस्फोटासाठी महाराष्ट्रात ५७ हजार अर्ज विविध ठिकाणांच्या न्यायालयात दाखल आहेत. त्यापैकी पुणे-मुंबईतच १७ हजारांच्या आसपास न्यायालयात प्रकरणे चालू आहेत. विशेष म्हणजे यामध्ये प्रेमविवाह केलेल्या ८० टक्के प्रकरणांचा समावेश आहे. आईवडिलांच्या संमतीविना विवाह केल्यामुळे शेवटी अनेक मुली लग्नानंतर न्यायालयात घटस्फोटासाठी धाव घेत आहेत. कौटुंबिक, आर्थिक, स्वभाव, भांडणे, आवडनिवड आदी कारणांमुळेही घटस्फोट होत आहेत. लग्नानंतर पती वेळ देत नाही. सततची भांडणे होतात. त्यातून कौटुंबिक कलह निर्माण झाले आहेत. नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. एकत्र कुटुंबपद्धतीमध्येही अंतर्गत कलहामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे.'
'अनेक जण करीअरच्या नादात लग्नाचे वय ओलांडतात. ३० किंवा ३५ वर्षे झाल्यानंतर तडजोड करून जीवनाचा साथीदार निवडतात. परंतु, मैत्री, प्रेम आणि लग्न यांत फरक आहे. लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात. त्याची जाणीव लग्नाआधीच व्हायला हवी. एकत्रित किंवा विभक्त कुटुंबपद्धतीविषयी मुलींनी आईवडीलांबरोबर अगोदरच चर्चा केली पाहिजे. प्रेमात पडला असल्यास प्रथम आईवडिलांना विश्वासात घ्या. प्रसंगी समुपदेशन केंद्राची मदत घ्या. लग्न सहजपणे घडून येणारी घटना नाही. स्वतःची योग्यता, अपेक्षा यांची सांगड घालायला हवी. निष्ठेने आणि एकमताने स्वीकारलेले नाते म्हणजेच लग्न असते. एकमेकांचा विश्वास हा प्रत्येक यशस्वी लग्नाचा महत्त्वाचा पाया आहे,' असेही त्यांनी स्पष्ट केले.
'लैंगिकता या विषयावर मोकळेपणाने बोलणे, ही काळाची गरज आहे,' असे डॉ. सागर पाठक यांनी सांगितले. वर्षा कुलकर्णी, डॉ. अश्विनी ओझा यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. उपप्राचार्य डॉ. क्षितीजा गांधी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, प्रा. पद्मावती पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ऐश्वर्या बिरादार, निकिता गवळी यांनी सूत्रसंचालन केले.