म. टा. प्रतिनिधी, पुणे
श्रीनगरमधील प्रसिद्ध लाल चौकातील पंचमुखी हनुमान मंदिरात मोठ्या दिमाखात बाप्पा विराजमान झाला आहे. कलम ३७० रद्द झाल्यानंतर स्थानिक व्यवहार ठप्प झाले, तरी ३७ वर्षांच्या या परंपरेत खंड पडलेला नाही. यंदाच्या उत्सवासाठी मूर्ती कशी आणायची, असा प्रश्न असताना विघ्नहर्त्याच्या उत्सवासाठी पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळाने बाप्पाची मूर्ती पाठवली. लोकांच्या मनात लाल चौकाची विशिष्ट प्रतिमा निर्माण झाली असताना याच ठिकाणी 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर होत आहे. 'गणेशोत्सव मराठी आणि काश्मिरी लोकांच्या प्रेमाचे उदाहरण आहे,' अशी भावना श्रीनगरमधील सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या डॉ. अमित वांच्छू यांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केली.
हरिसिंग स्ट्रीट आणि शहीद गंज भागातील सोन्याच्या दुकानात काम करणारे मराठी लोक सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव भागातून तेथे स्थायिक झाले आहेत. मराठी लोकांबरोबर काश्मीर पंडित, मुस्लिम व शीखधर्मीय दर वर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतात. मराठी लोकांच्या घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना होते. हनुमान मंदिरातील उत्सवासाठी दर वर्षी सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथून गणेशमूर्ती पाठविली जाते. यंदा पूरस्थितीमुळे सांगलीतील जनजीवन विस्कळित झाल्याने; तसेच काश्मीरमधील व्य़वहार ठप्प झाल्याने मूर्ती कशी आणायची हा प्रश्न होता; पण गणरायाच्या उत्सवासाठी मार्ग निघालाच! 'सरहद'चे संस्थापक संजय नहार यांच्या प्रयत्नातून हुतात्मा बाबू गेनू मंडळाने आपल्या मूर्तीची प्रतिकृती पाठवण्याचा निर्णय घेतला. लेखक संजय सोनवणी ही मूर्ती घेऊन श्रीनगरमध्ये दाखल झाले. जम्मू-काश्मीरच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव पांडुरंग पोळ व स्थानिक लोकांच्या उपस्थितीत उत्सवाला सुरुवात झाली.
अमित म्हणाले, 'गणपती लोकांना जोडतो. येथे ३७ वर्षांपासून साजरा होणारा गणेशोत्सव मराठी आणि काश्मिरी लोकांच्या प्रेमाचे उदाहरण आहे. प्रेमाच्या या परंपरेत खंड पडू द्यायचा नव्हता. सार्वजनिक पातळीवर एखादा उत्सव लोकांच्या सहभागाशिवाय सफल होत नाही. गणेशोत्सवात मराठी लोकांबरोबर काश्मिरी पंडित, मुस्लिम, शीख असे सर्व घटक सहभागी होतात. काश्मीरमधील परिस्थिती कशीही असो, या परंपरेत कधीही खंड पडलेला नाही.'
काश्मीरमध्ये सण, उत्सव साजरे करता येत नाहीत, हा गैरसमज आहे. काश्मीर ही पार्वतीची भूमी असल्याने, या भूमीचे गणपतीशी नाते आहे. गणेश चर्तुर्थीदिवशी 'पन' हा सण साजरा होतो.
- डॉ. अमित वांच्छू
मी पुण्यातून मूर्ती घेऊन श्रीनगरमध्ये दाखल झालो. सर्वधर्मीय सहभागी झाल्याने उत्सवाला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. 'पन' उत्सव पाहता आला. सध्या काश्मीरमधील वातावरण चिंताग्रस्त असले, तरी लोकांचे अंतर्गत संबंध चांगले आहेत.
- संजय सोनवणी, लेखक
श्रीनगरमधील प्रसिद्ध लाल चौकातील हनुमान मंदिरात गणपती बाप्पा मोठ्या दिमाखात विराजमान झाला आहे. लेखक संजय सोनवणी यांच्यासह काश्मीर येथील नागरिक.