म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे
यंदा गणरायाचे नेहमीसारखे वाजतगाजत स्वागत करता आले नाही आणि भव्य मिरवणुकीने निरोपही देता आला नाही. गणेशोत्सवावर मनापासून प्रेम करणाऱ्या पुणेकरांना यंदा चुकल्याचुकल्यासारखे वाटलेच आहे; पण म्हणून बाप्पावरील भक्ती, प्रेम कमी झाले, असे नाही. उलट करोनाचे विघ्न परतवून लावण्याचे आव्हान शहराने स्वीकारले आहे आणि विघ्नहर्त्याला निरोप देताना त्यासाठी बळही मागितले आहे.
गेल्या अनेक वर्षांत प्रथमच शहराने मिरवणुकीविना विसर्जनाचा दिवस अनुभवला असेल. ज्या लक्ष्मी रस्त्यावर एरवी अनंत चतुर्दशीच्या दिवशी पाऊल ठेवायला जागा उरत नाही, तेथे यंदा रस्ताच पावलांच्या प्रतीक्षेत होता. रांगोळीच्या पायघड्यांनी नटणारा हा रस्ता कोरेपण स्वीकारून स्तब्धतेची सावली झाला होता. ढोल-ताशांची लय त्याच्यात भिनली नाही, की 'गणपतीबाप्पा मोरया'च्या उत्साही आरोळ्यांनी तो शहारलाही नाही. मात्र, या शांततेत भय नव्हते, तर होते समंजस शहाणपण आणि परिस्थितीला स्वीकारून ठामपणे उभे राहण्याची शहाणीव!
बहुतांश नागरिकांनी घरी, तसेच गणेश मंडळांनी मांडवात उभारलेल्या कृत्रिम हौदात गणपतीचे विसर्जन केल्याने मिरवणुकीतील गर्दीने फुलून जाणारे मध्यवस्तीतील रस्ते निर्मनुष्य होते. सार्वजनिक उत्सवाचे नेहमीचे वातावरण नसले, तरी घरोघरी गणरायाचे आगमन भक्तिभावानेच झाले. सार्वजनिक मंडळांचे देखावे, रोषणाई, विविध उपक्रम यांची अनुपस्थिती मात्र जाणवत राहिली. गणपती पाहण्यासाठी घराबाहेर पडणारी पावले घराच्या उंबऱ्याच्या आतच थांबली. विसर्जनाच्या दिवशीही शिस्तीचा हा शिरस्ता मोडला नाही. करोनाच्या विघ्नाने जगण्याची मिती बदलली आहे, याचे भान असलेल्या पुणेकरांनी उत्सवाचे हे 'नवसाधारण' रूपही स्वीकारले. सांस्कृतिक कार्यक्रम, प्रत्यक्ष गणपती दर्शन यांची उणीव डिजिटल पडद्याने जाणवू दिली नाही आणि ऑनलाइन रूपापुढेही हात आपोआप जोडले गेले! गणेश मंडळांनी दाखवलेल्या समाजभानामुळे पोलिस आणि व्यवस्थेवरील ताण कमी झाला. उत्सव काळात यंदा एकही गुन्हा दाखल झाला नाही, हे विशेष!
डोळ्यांना न दिसणाऱ्या एका विषाणूने डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या उत्सवात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला खरा; पण भक्तांनी डोळे मिटून आपल्या लाडक्या बाप्पाचे स्मरण केले आणि विघ्नहर्त्यापुढे तो नतमस्तक झाला. बाप्पाचे विसर्जन होताना डोळ्यांत पाणी आले... गणपतीने आपल्याला काय आशीर्वाद दिला, असा विचार करताना भक्ताच्याच आतून आवाज आला, 'काळजी करू नकोस; पण काळजी मात्र घे!'
यंदा गणरायाचे नेहमीसारखे वाजतगाजत स्वागत करता आले नाही आणि भव्य मिरवणुकीने निरोपही देता आला नाही. गणेशोत्सवावर मनापासून प्रेम करणाऱ्या पुणेकरांना यंदा चुकल्याचुकल्यासारखे वाटलेच आहे; पण म्हणून बाप्पावरील भक्ती, प्रेम कमी झाले, असे नाही. उलट करोनाचे विघ्न परतवून लावण्याचे आव्हान शहराने स्वीकारले आहे आणि विघ्नहर्त्याला निरोप देताना त्यासाठी बळही मागितले आहे.
गेल्या अनेक वर्षांत प्रथमच शहराने मिरवणुकीविना विसर्जनाचा दिवस अनुभवला असेल. ज्या लक्ष्मी रस्त्यावर एरवी अनंत चतुर्दशीच्या दिवशी पाऊल ठेवायला जागा उरत नाही, तेथे यंदा रस्ताच पावलांच्या प्रतीक्षेत होता. रांगोळीच्या पायघड्यांनी नटणारा हा रस्ता कोरेपण स्वीकारून स्तब्धतेची सावली झाला होता. ढोल-ताशांची लय त्याच्यात भिनली नाही, की 'गणपतीबाप्पा मोरया'च्या उत्साही आरोळ्यांनी तो शहारलाही नाही. मात्र, या शांततेत भय नव्हते, तर होते समंजस शहाणपण आणि परिस्थितीला स्वीकारून ठामपणे उभे राहण्याची शहाणीव!
बहुतांश नागरिकांनी घरी, तसेच गणेश मंडळांनी मांडवात उभारलेल्या कृत्रिम हौदात गणपतीचे विसर्जन केल्याने मिरवणुकीतील गर्दीने फुलून जाणारे मध्यवस्तीतील रस्ते निर्मनुष्य होते. सार्वजनिक उत्सवाचे नेहमीचे वातावरण नसले, तरी घरोघरी गणरायाचे आगमन भक्तिभावानेच झाले. सार्वजनिक मंडळांचे देखावे, रोषणाई, विविध उपक्रम यांची अनुपस्थिती मात्र जाणवत राहिली. गणपती पाहण्यासाठी घराबाहेर पडणारी पावले घराच्या उंबऱ्याच्या आतच थांबली. विसर्जनाच्या दिवशीही शिस्तीचा हा शिरस्ता मोडला नाही. करोनाच्या विघ्नाने जगण्याची मिती बदलली आहे, याचे भान असलेल्या पुणेकरांनी उत्सवाचे हे 'नवसाधारण' रूपही स्वीकारले. सांस्कृतिक कार्यक्रम, प्रत्यक्ष गणपती दर्शन यांची उणीव डिजिटल पडद्याने जाणवू दिली नाही आणि ऑनलाइन रूपापुढेही हात आपोआप जोडले गेले! गणेश मंडळांनी दाखवलेल्या समाजभानामुळे पोलिस आणि व्यवस्थेवरील ताण कमी झाला. उत्सव काळात यंदा एकही गुन्हा दाखल झाला नाही, हे विशेष!
डोळ्यांना न दिसणाऱ्या एका विषाणूने डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या उत्सवात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला खरा; पण भक्तांनी डोळे मिटून आपल्या लाडक्या बाप्पाचे स्मरण केले आणि विघ्नहर्त्यापुढे तो नतमस्तक झाला. बाप्पाचे विसर्जन होताना डोळ्यांत पाणी आले... गणपतीने आपल्याला काय आशीर्वाद दिला, असा विचार करताना भक्ताच्याच आतून आवाज आला, 'काळजी करू नकोस; पण काळजी मात्र घे!'