म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज, मंगळवारी (२५ जून) पिंपरी-चिंचवडमध्ये आगमन होणार आहे. यानिमित्त आकुर्डीतील मुक्कामाच्या ठिकाणी तयारी पूर्ण झाली आहे.
पालखीचा पहिला मुक्काम आकुर्डीतील श्री विठ्ठल मंदिरात आहे. भाविकांच्या स्वागतासाठी उद्योगनगरी सज्ज झाली आहे. या ठिकाणी महापालिकेच्या वतीने निवास, पाणी, विद्युत आणि शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील खड्डे दुरुस्ती करण्यात येत असून, सर्व वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने पालखी आगमनापासून ते मार्गस्थ होण्यापर्यंत सर्व सोयीसुविधा मुबलक प्रमाणात देण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने भक्ती-शक्ती चौक ते दापोडीच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. पालखीच्या मुक्काम तळावर सर्वांना दर्शन घेणे सुलभ व्हावे, यासाठी महिला आणि पुरुषांसाठी वेगळ्या दर्शनबारीची सोय करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी महापालिकेच्या शाळांच्या वर्गखोल्या खुल्या करण्यात आल्या आहेत. पालखी मार्गावर पुरेशी प्रकाश योजना करण्यात आली असून, कचराकुंड्या स्वच्छ ठेवण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे बुधवारी (२६ जून) दिघी-मॅगझिन चौक, भोसरी येथे आगमन होणार आहे. या सोहळ्यासमवेत पाण्याचे टँकर आणि वैद्यकीय सेवासुविधांसह रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मुक्कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, पुरेशी सुरक्षा व्यवस्था तसेच सुमारे पाचशे फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. अग्निशमन दलाची गाडी सुसज्ज पथकासह पंढरपूरपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालखी सोहळा कालावधीत शहरात स्वच्छता ठेवणे, पालखी मार्गस्थ झाल्यानंतर रस्ते स्वच्छ ठेवणे व पालखी मार्गक्रमणामध्ये चोख व्यवस्था करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.