लातूर पालिकेतील पदाधिकाऱ्यांचा सूर
लातूर, अरुण समुद्रे
लातूरातील नागरिकांना, उद्योगांना, केंद्र सरकारच्या केंद्रिय राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षण केंद्राला मांजरा धरणातील पाणी वापरले जाते. केज तालुक्यातील धनेगावपासून लातूरपर्यंतच अंतर ६५ किलोमीटर इतके आहे. या मार्गावर मुख्य जलवाहिनी असून ती फुटल्यामुळे अनेक समस्यांची उकल आता होऊ लागली आहे. २०१६ च्या पाणी टंचाईमुळे लातूरची सर्वत्र बदनामी झाली. रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला या पाणी टंचाईला पाण्याची गळती, पाण्याची चोरीसुद्धा एक कारण होते असे आता लक्षात येऊ लागले आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अभियंते, कर्मचाऱ्यांनी चोरी होत असलेले ११ नळ कनेक्शन तोडले. दोन दिवसांत आता काही जण सक्रिय झाले असून तेच कोणा-कोणाकडे अशास्वरुपाचे नळ कनेक्शन आहेत हे सांगत आहेत. त्यामुळे या ६५ किलोमिटर अंतरात होणारी चोरी आणि जाणवणारी टंचाई आणि टंचाईची नाहक केली जात असलेल्या चर्चेमुळे औद्योगिक विकासाला खिळ बसत आहे. याचा गांभिर्यानी विचार आणि कृती करण्याची वेळ आली आहे.
पाणी टंचाईची जेवढी चर्चा झाली तेवढी पाणी चोरीची चर्चा होत नाही. या बाबत पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती शैलेश गोजमगुंडे म्हणाले, 'पाणी चोरी ही किती दिवसापासून आहे?, पाणी कोण-कोण चोरते त्यात शेतकरी किती, कारखानदार किती? पाणी पिण्यासाठी कोण चोरतो, शेतीसाठी, उसासाठी किती या सगळ्याचा सखोल तपास झाला पाहिजे. कारण लातूरच्या करदात्यांकडून आम्ही जर पाणीपट्टी वसूल करीत असलो तर त्या पाण्यावर पहिला हक्क त्यांचा आहे. त्यामुळे त्या करदात्यांना नेमके पाणी कोण आणि कशासाठी चोरतो याची माहिती मिळालीच पाहिजे, यासाठी आम्ही प्रशासनाकडे आग्रह धरणार असून अधिकृतपणे माहिती देऊन या चोरीची सखोल चौकशी करण्यासाठी आग्रही राहणार आहोत.'
पाणीटंचाई आणि उपाययोजना या विषयासाठी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत पोटतिडकीने अधिकृत नळकनेक्शन किती, बेकायदा नळे किती, पाणी उपसा किती होतो? जलशुद्धीकरण केंद्रात किती येते, जलशुद्धीकरण झाल्यानंतर थेट ग्राहकांच्या नळाला किती पाणी दिले जाते या सगळ्याच वॉटर ऑडीट झाले पाहिजे अशी मागणी ही केली होती. त्या मागणीच महत्व गेल्या दोन दिवसांतील घटनावरून दिसून येत आहे. आता तरी सर्वानी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन माझ्या मागणीचा पाठपुरावा करावा, असे मत भाजपचे प्रवक्ते शैलेश स्वामी यांनी व्यक्त केले.
पालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य संगीत रंदाळे म्हणाले, 'मांजरा धरणाच्या पाण्यावरच केंद्र सरकारचा महत्वाचा प्रकल्प आहे. त्यांना पाणी कमी पडले तर त्यााता परिणाम हा देशपातळीवर होत असतो. औद्यागिक क्षेत्राला पाणी कपात झाली तर उद्योग बंद करावे लागतात. त्यामुळे पुन्हा बदनामी होते हे सर्व टाळण्यासाठी जेवढी पाणी आम्ही विकत घेतो, तेवढे पालिकेला मिळालेच पाहिजे यासाठी आता कृती करण्याची वेळ आली आहे.'
पालिका प्रशासनाने याचा सर्व्हे केला पाहिजे. पाणी चोरीच्या शोधासाठी भरारी पथक नेमले पाहिजे आणि मुख्य जलवाहिनीवर जेवढे बेकायदा नळ कनेक्शन आहेत ते तोडलेच पाहिजेत.
- दीपक सूळ, विरोधी पक्षनेते, काँग्रेस
सध्या मुख्य जलवाहिनीच्या मार्गावर गस्तीपथक नियुक्त केले आहे. त्यांच्याकडून माहिती घेऊन सर्वच बेकायदा नळ कनेक्शन तोडणार आहोत. पाणी हे पिण्यासाठी आरक्षीत आहे, यासाठी ग्रामस्थांशी बोलून प्रबोधन केले जात आहे. त्यांनी रितसर मागणी केली तर त्याचा विचार होईल. या पुढे पाण्याची चोरी करणारी व्यक्ती असो की, संस्था त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करणार आहोत.
- कौस्तुभ दिवेगावकर, आयुक्त, लातूर पालिका
तांदुळजा ग्रामपंचायतीचा विरोध
दोन दिवसांत अजून काही बेकायदा नळ कनेक्शन उघडकीस आले आहेत. मुख्य जलवाहिनीवरून रांजणी गावाला अधिकृतपणे पिण्याच्या पाण्यासाठी पाणी दिले जावे अशी रांजणी ग्रामपंचायतीची मागणी आहे. लातूर तालुक्यातील तांदुळजा ग्रामपंचायत मात्र, कनेक्शन तोडू देत नाही. त्यांच्याकडून याबाबत विनंती किंवा मागणी केली जात नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.