म. टा . प्रतिनिधी, पुणे
'पाल्याच्या करिअरविषयी पालकच अधिक जागरूक असतात. मात्र, मुलांचा कल, शारीरिक आणि मानसिक क्षमता तसेच पालकांची आर्थिक क्षमता पाहूनच करिअरचे नियोजन करावे. अभ्यासक्रमासाठीचा प्रवेश किंवा करिअरचा ताण घेतला आणि त्याचे रूपांतर तणावात झाले की समस्यांमध्ये भरच पडते,' असा सूर 'अॅडमिशन व करिअर : ताण आणि ताण-नियमन' या विषयावरील चर्चासत्रात व्यक्त झाला.
पुणे सिटीझन्स डॉक्टर फोरम आणि सार्थक वेल्फेअर फाऊंडेशनतर्फे आयोजित या सत्रात ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे यांनी प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शिरीषा साठे आणि ज्येष्ठ करिअर मार्गदर्शक डॉ. श्रीराम गीत यांच्याशी संवाद साधला.
'खेळण्याला चावी दिली, तर ताण येतो, पण त्या ताणाचे तणावात रूपांतर झाले, तर ती चावी तुटते. त्याचप्रमाणे मानवी मनाच्या ताणाचे रूपांतर तणावात झाले की, अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणून पालकांसह पाल्यांनाही ताण आणि तणावातील सीमारेषा ओळखता आली पाहिजे. यश-अपयश याची संज्ञा तपासून पाहणे आवश्यक आहे. अपयश हीदेखील शिकण्याची प्रक्रिया असते. कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी काही प्रमाणात ताण आवश्यक असतो. करिअर या शब्दाच्या छटा खूप अस्पष्ट आहेत. वयानुसार येणाऱ्या शैक्षणिक टप्प्यांवर पालकांचा पाल्यांशी संवाद राखणे आवश्यक आहे. पालकांनी पाल्यास आश्वस्त करताना आपण त्याला परावलंबी तर बनवत नाही ना, याचे भान राखणे आवश्यक आहे,' असे डॉ. साठे म्हणाल्या.
'मुलांच्या बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक क्षमता आणि पालकांची आर्थिक क्षमता याचा सारासर विचार करून मुलांच्या करिअरविषयी नियोजन करावे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान यासारख्या ग्लॅमरस करिअर व्यतिरिक्त करिअरची अनेक क्षेत्रे असून ती जोखून पाहिली पाहिजे,' असे डॉ. गीत म्हणाले. 'मुले बहुतेक वेळा काल्पनिक जगात वावरत असतात. तो त्यांच्या वयाचा भाग असतो. पालक त्यांच्या अनुभवावर वास्तव पर्याय शोधत असतात,' असेही त्यांनी स्पष्ट केले.
'अलीकडे करिअर पॅकेज, पद आणि परदेशवारी या त्रिकोणातच अडकलेले दिसते. वास्तवदर्शी परिस्थितीची अभ्यास केला असता पॅकेज, पद आणि परदेशवारी या तिन्ही गोष्टी हजारात एका विद्यार्थ्याला मिळतात. करिअरचे आकर्षण आणि सर्वार्थाने क्षमता याचे भान पालक आणि पाल्यांनी ठेवावे. या भानाचा तोल गमावल्यास परिस्थिती अवघड होते,' अशी वस्तुस्थिती डॉ. गीत यांनी उपस्थितांसमोर मांडली. मृणाल राजहंस यांनी प्रास्तविक केले. स्वाती नामजोशी यांनी कार्यक्रम आयोजनामागील भूमिका मांडली.
- परिसंवादात डॉ. शिरीषा साठे, आनंद आगाशे आणि डॉ. श्रीराम गीत यांनी उपस्थितांशी संवाद साधला.