म. टा. प्रतिनिधी, पुणे
देशभरात तीन मेपर्यंत लॉकडाउन असून केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला मुभा असतानाही आता २० एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गांवर टोल वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तशी सूचना केली आहे.
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्चला संपूर्ण देशात २१ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर केले. त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोलवसुली तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्याचे आदेश दिले. यामुळे आपत्कालीन सेवापुरवठ्यात येणारी गैरसोय तर कमी होईलच; शिवाय वेळेची बचत होईल, असे गडकरी यांनी म्हटल्याचे एका वृत्तसंस्थेने प्रसारित केले होते. पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेला लॉकडाउन १४ एप्रिलपर्यंत होता. आता त्यात वाढ करण्यात आली असून, तीन मेपर्यंत लॉकडाउन असणार आहे. मात्र, लॉकडाउन वाढवला असला, तरीही महामार्गावरील टोलवसुली बंद ठेवण्याचा निर्णय मात्र रद्द केला आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व प्रकारच्या जीवनावश्यक माल वाहतुकीला परवानगी दिली आहे. तसेच, केंद्रीय गृह मंत्रालयाने चारच दिवसांपूर्वी या माल वाहतुकीला कोणताही अडथळा येऊ न देण्याची सूचना राज्यांना केली आहे. मात्र, आता या वाहतुकीला टोल वसुलीचा फटका बसणार आहे.
..........
तोट्याच्या वाहतुकीला टोलचा भुर्दंड
सध्या जिल्हा बंदी आणि लॉकडाउनमुळे महामार्गांवर प्रामुख्याने अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहनेच धावत आहेत. सध्या शेतमाल किंवा अन्य जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादक, व्यापारी मोठ्या नुकसानीचा सामना करत आहेत. शेतकऱ्यांना तर मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थिती टोलवसुली करून त्यांच्या खिशावर आणखी भुर्दंड टाकणारा हा निर्णय असल्याची भावना जनसामान्यांतून उमटली आहे.
...........
टोल स्थागितीवरच प्रश्नचिन्ह
मुळात लॉकडाउन जाहीर झाल्यावर टोलवसुली बंद करण्याचा घेतलेला निर्णयच संशयास्पद आहे. भविष्यात टोल स्थागितीच्या बदल्यात टोल कंत्राटदारांना नुकसान भरपाई द्यायची सोय तर सरकारने केली नाही ना, असा प्रश्न निर्माण होतो. नोटाबंदीच्या काळात जेवढा काळ टोल बंद होता, तेवढ्या दिवसाची नुकसान भरपाई टोल कंत्राटदारांना दिली गेली, असे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी म्हटले आहे.
...........
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या सूचनेनुसार महामार्गावरील टोलवसुली २० एप्रिलपासून सुरू केली जाणार आहे.
- सुहास चिटणीस (प्रकल्प संचालक, एनएचएआय)
..........
लॉकडाउनमुळे जवळपास एक महिना देशभरात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या ट्रकचालकांची आता सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांना टोलचा बडगा बसणार आहे. या निर्णयामुळे टोल कंत्राटदारांचे नुकसान थांबेल; पण महिनाभर चक्का जाम झालेल्या वाहतूकदारांना कोणी नुकसानभरपाई देणार नाही. त्यात आता टोलचा भुर्दंड पडणार आहे.
- विवेक वेलणकर (अध्यक्ष, सजग नागरिक मंच)
.....