म. टा. प्रतिनिधी, पुणे
'माझ्या मतदारसंघातील एका तरुणाने खासगी दूरचित्रवाणी वाहिनीवरील बातमीची क्लिप फेसबुकवर 'पोस्ट' केली. त्यानंतर त्याला धमकी देण्यात आली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी बारामतीत दौऱ्यावर येणार असल्याने त्याची तक्रार पोलिसांकडून घेण्यात आली नाही. हाच काय न्याय आणि पारदर्शी कारभार,' असा सवाल बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केला.
'महायुती'च्या उमेदवाराच्या प्रचारासाठी काही कार्यकर्ते बारामतीत गेल्यावर त्यांना विरोध झाल्याच्या घटनेची क्लिप ही एका दूरचित्रवाणीवर दाखविण्यात आली. बारामतीतील सोमेश्वरनगर भागातील ज्ञानेश्वर पोमण या तरुणाने ती क्लिप फेसबुकवर पोस्ट केली. त्यामुळे त्याला धमकी देण्यात आली आहे. याबाबत पत्रकार परिषदेत सुळे यांनी भाजपच्या कारभारावर टीका केली.
त्या म्हणाल्या, 'धमकी दिल्याचा प्रकार हा दखलपात्र गुन्हा आहे. तो तरुण पोलिसांकडे गेला असता, त्याला राज्यात अडचणी आहेत, मुख्यमंत्री बारामतीमध्ये येणार असल्याने तक्रार घेणार नाही, असे सांगण्यात आले. जीव घेण्याची धमकी तरुणाला दिली गेली असताना, मुख्यमंत्री दौऱ्यावर असल्याने तक्रार घेतली न जाणे, हा काय पारदर्शी कारभार झाला का?'
'या घटनेनंतर मी आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पोलिसांना फोन करावा लागला. एखादी पोस्ट ही चुकीची असेल, तर जरुर कारवाई केली पाहिजे; पण वास्तव परिस्थिती असलेली पोस्ट टाकली असता, पोलिसांनी अशी भूमिका घेणे योग्य नाही. सध्या मनमोकळेपणाने श्वास घेता येणे अशक्य झाले आहे का, अशी चिंता वाटते. पारदर्शक हा शब्द सतत बोलला जातो. पारदर्शक कारभार हा कृतीमधून दिसला पाहिजे. फक्त भाषणातून नाही. बारामतीतील ही घटना दुदैवी आहे,' असेही त्या म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्टार नेते नाहीत आणि बारामती मतदारसंघासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे खडकवासल्यामध्ये सभा घेत असल्याची टीका केली जात आहे, याबाबत विचारणा करण्यात आली असता, त्या म्हणाल्या, 'बारामती ही अशी जागा आहे की, सर्वांना यायला आवडते. आमच्यावर टीका करायला काहीच राहिले नाही, म्हणून ते राज ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत.'
.........
'पंतप्रधान मोदींचे आभार'
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने प्रचारात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. याबाबत सुळे म्हणाल्या, 'पंतप्रधान मोदी हे आमचे कुटुंब आणि शरद पवार साहेबांचे नाव घेत असतात. त्याबद्दल त्यांचे आभार मानते. कारण महाराष्ट्रात आल्यावर त्यांचे नाव घेतल्याशिवाय हेडलाइन होत नाही.'