म. टा. प्रतिनिधी, पुणे
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे धन्वंतरी सभागृहात 'लाभले आम्हास भाग्य' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संत ज्ञानेश्वर रचित पसायदानापासून सुरू झालेल्या काव्यप्रवासात संत मुक्ताबाई, संत जनाबाई, कान्होपात्रा, मोरोपंत, केशवसुत, बालकवी, स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रज, ग. दि. माडगूळकर, मंगेश पाडगावकर यांच्या कविता सादर करण्यात आल्या.
अशोक अडावदकर, राजेंद्र देशपांडे, शंतनू घमेंडी, विनिता गरूड, संध्या कुलकर्णी, सुलभा इंगळेश्वर, आरती देवगावकर यांनी कविता सादर केल्या. दुसऱ्या सत्रात 'कलायात्री' आयोजित 'माझ्या मराठीचा लळा' हा कवी, नाटककार, लेखक या तिन्ही रूपांतील कुसुमाग्रजांच्या रचनांवर आधारित काव्य, नाट्य आणि गायनाचा कार्यक्रम झाला. वसंत दातार, महेंद्र नाईकवाडे, श्रीकांत सागर, मृणालिनी फुलगिरीकर, अंजली कागलकर, भारती गोसावी, मधुकर पोहोनेकर, शैलजा साने, कविता वतनी, उज्ज्वला मान्नीकर, अपर्णा चितळे यांनी सादरीकरण केले. सुहास पेटवे (तबला) व अरविंद देशपांडे (हार्मोनियम) यांनी भाग घेतला. अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी प्रास्ताविक केले.