विष्णू वाघ गोव्याचा असला, तरी संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय होता. त्याने कोकणी आणि मराठी भाषेमध्ये विपुल लेखन केले. तो उत्तम नाटककार होता. साहित्य क्षेत्रातील त्याचे योगदान मोठे आहे. गोवा विधानसभेचा उपसभापती म्हणून त्याने जबाबदारी पार पाडली. आधी काँग्रेस आणि नंतर भारतीय जनता पक्षात तो कार्यरत होता. महाराष्ट्रातील अनेक कवीसंमेलनात तो सहभागी व्हायचा. त्याच्या काव्यात गोव्याच्या मातीचा गंध होता. पुरोगामी विचारांचे प्रतिबिंब त्याच्या काव्यात उमटत होते. मी अत्यंत जवळचा मित्र गमावला आहे.
- रामदास फुटाणे, कवी व वात्रटिकाकार
-----------
विष्णू सूर्या वाघ अनेक वर्षांपासूनचा मित्र होता. त्याच्या लेखनाची शैली गोव्यातील लोककलांमधून उपजलेली होती. माणूस, संघटन, संयोजक म्हणून अतिशय दिलदार कार्यकर्ता होता. मुख्य म्हणजे गोव्यात त्याचे राजकीय वजन होते. आमदार म्हणून त्याने आपली हातोटी सिद्ध केली होती. आम्हाला जवळचे व्यक्तिमत्त्व म्हणून त्याचा साहित्याशी असलेला संबंध महत्त्वाचा वाटतो. माझ्या दृष्टीने ही अनपेक्षित घटना आहे. आजही तो आमच्या अंत:करणात त्याच्या कवितेमुळे आणि एक मित्र म्हणून जिवंत आहे.
- फ. मुं. शिंदे, कवी
----------------