सदासर्वकाळ बिर्याणीला वाढती पसंती
म. टा. प्रतिनिधी, पुणे
दादा, भाऊ, अण्णांच्या प्रचारार्थ अहोरात्र राबणाऱ्या कार्यकर्त्यांना गरमागरम बिर्याणी आणि फूड पॅकेट पोहचविण्यासाठी शहरातील बहुसंख्य कूक बुक झाल्याचे चित्र आहे. बड्या उमेदवारांनी तर आपले खास खानसामे पुढील आठ दिवस घरीच जाणार नाहीत असे फर्मान सोडले आहे. दिवसभराच्या धावपळीत उमेदवारांसह कार्यर्त्यांचे जेवणाकडे होणारे दुर्लक्ष टाळण्यासाठी हा खटाटोप केला जात असल्याचे प्रचारप्रमुखांचे म्हणणे आहे.
निवडणूक आयोगाची करडी नजर आणि दमलेल्या कार्यकर्त्यांना वेळेवर गरम जेवण पुरविण्यासाठी अनेक क्लृप्त्या राबविल्या जात आहेत. उमेदवारांच्या पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांकडून खानसाम्यांना काय हवे, नको याकडे जातीने लक्ष देण्यात येत आहे. तसेच, त्यांनी दररोज किती लोकांचे जेवण बनवायचे, मेन्यू काय असेल हे ठरवून दिले जात आहे. त्यानुसार नियोजनाची जबाबदारी सांभाळणारे, दररोज कार्यालयात असणाऱ्यांचे जेवण बनविले जात आहे. तर प्रचारासाठी मतदारसंघात फिरणाऱ्यांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली आहे.
कार्यकर्त्यांची बिर्याणीची वाढती मागणी लक्षात घेता सामिष भोजनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या खानसाम्यांना आगामी आठ दिवसांसाठी बुक करण्यात आले आहे. अर्धा, एक, चार आणि पाच किलो बिर्याणी बनवून ते घरोघरी पाठविणाऱ्यांकडे सध्या वेटिंग पाहायला मिळत आहे. मतदारसंघातील कोणत्या भागात किती पातेली पोहोचवायची, हे सायंकाळी साडेसात-आठ वाजता कळविण्यात येते. पारंपरिक पंगतींची जागा आता बिर्याणींच्या पातेल्यांनी घेतली असून, वस्त्यांसह मोठमोठ्या गृहसंकुलांच्या टेरेसवर देखील मतदारांच्या पार्ट्या रंगू लागल्या आहेत. हॉटेलचे कूपन देण्याऐवजी आणि तिकडे झालेला राडा कालांतराने निस्तरणे अवघड जात असल्याने खानसामाच आठ दिवसांसाठी आणून ठेवणे अनेक उमेदवारांनी पसंत केले आहे. ज्या कार्यकर्त्यांना उघड प्रचार करणे अथवा मुख्य प्रचार कार्यालयाच्या आसपास येऊन जेवणे शक्य नाही, अशांसाठी सोसायटी, वस्त्यांमध्ये पातेली पाठवून देणे सोयीचे होऊ लागले आहे.