म. टा. प्रतिनिधी, पुणे
सामाजिक दरी कमी होण्यासाठी समाज आणि सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणे गरजचे आहे, असे मत सिटी कॉर्पोरेशन कंपनीचे व्यवस्थापक अनिरुद्ध देशपांडे यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ पुणे-कात्रज यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी आखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस प्रमिला गायकवाड यांना सेवा गुणवत्ता पुरस्कार, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू अभिजित कुंटे आणि प्रसिद्ध चार्टड अकाउंटंट प्रदीप कटारिया यांना व्यावसयिक गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी पुरस्कारार्थी आणि प्रमुख पाहुण्यांची विवेक कुलकर्णी यांनी मुलाखत घेतली.
गायकवाड म्हणाल्या, 'महिलांना निसर्गत:च मोठी शक्ती मिळालेली असते. त्यामुळे त्या कुठल्याही प्रसंगांना धीराने सामोऱ्या जातात आणि संस्था नेटक्या पद्धतीने चालवितात.'
कुंटे म्हणाले, 'खेळाडू हा नेहमीच धीराचा, प्रयत्नशील आणि सकारात्मक असतो. त्यामुळे समाज चांगला होण्यास मदत होते. सध्या गुजरात आणि महाराष्ट्र मिळून दीड लाख विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. पुढील पाच वर्षांमध्ये देशभरातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्धार केला आहे.'
'तरुणांमध्ये सकारात्मकता आहे, ते प्रयत्नशील आहेत. परंतु, त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. कष्टाने मिळविलेल्या गोष्टीचा आनंद खूप मोठा असतो. तरुणांनी कष्टाचा ध्यास घ्यावा, असे मत कटारिया यांनी व्यक्त केले. देशपांडे यांनी अमनोरा सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर रुलर स्कायलर्स या संस्थेची संकल्पना सांगितली. रोटरी क्लब ऑफ पुणे-कात्रज चे अध्यक्ष अनंत तिकोणे प्रास्ताविक केले आणि विद्या पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
---