नांदेड : जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात गेल्या २४ तासांत दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. नायगाव तालुक्यातील धुप्पा येथील प्रल्हाद लक्ष्मण जांभळे (वय २५) हे सततची नापिकी व बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते अस्वस्थ होते. गुरुवारी सकाळी त्यांनी स्वत:च्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेतला. या प्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अन्य एका घटनेत उमरी तालुक्यातील शिंगणापूर येथील दिगांबर हिवराळे (वय ५०) यांनी बुधवारी रात्री विष पिऊन मृत्यूला कवटाळले. साडे तीन एकर शेती असलेल्या हिवराळे यांनी खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते होते. बुधवारी त्यांनी विष पिल्याने त्यांना उपचारार्थ नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी उमरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
दोन शेतकऱ्याच्या आत्महत्या
जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात गेल्या २४ तासांत दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Nov 2019, 4:00 am