- प्रणोती धुमाळ
आयुष्यात प्रत्येकाला असे वाटते, की नको कसली कटकट, नको तो कामाचा व्याप, नको ती दगदग, नको ते रोजचेच आयुष्य. रोज तेच तेच! रोज ऑफिसला जा, रोज काम करा. वैताग येतो अक्षरशः रोज तेच तेच करून; पण आज सगळे सुन्न झाले आहे आणि माणसाला आरामदायी आयुष्य नको झाले आहे.
आपल्याला सध्या फक्त खायचे आणि झोपायचे आहे; पण त्याचाही माणसाला कंटाळा येऊ लागलाय. मी नोकरी करते. मला यापूर्वी घरी अजिबात वेळ मिळत नव्हता. दर रोज ऑफिस आणि सुट्टीमध्ये बाहेर; पण आता जो वेळ मिळाला आहे, त्या वेळेत मी आरामदायी आयुष्य जगते आहे. ऑफिस नसल्याने निवांत झोपते. नंतर जिम बंद असल्याने घरीच व्यायाम करते आणि त्यानंतर 'वर्क फ्रॉम होम' चालू होते. दिवस कधी संपतो, ते कळतही नाही. सध्या बऱ्याच जणांना त्यांच्या कलेसाठी वेळ देता येत आहे. अनेकांचे याआधी माहिती नसलेले कलागुण समाजमाध्यमांद्वारे समोर येत आहेत. अर्थात, स्वतःच्या कुटुंबासाठी वेळ मिळतोय, ही छान गोष्ट आहे.
आपण आपल्या देशासाठी, स्वतःसाठी घरी बसत आहोत. ही कंटाळवाणी वेळ नाही, तर हा स्वतःला स्वतःसाठी देण्यात आलेला वेळ आहे; कारण आज या धकाधकीच्या जीवनात माणूस दिवसभरात सगळ्यांशी बोलतो; पण स्वतःला विसरतो. त्यामुळेच या वेळेला अनमोल करणे गरजेचे आहे. अशी वेळ कदाचित पुन्हा येणार नाही; म्हणूनच ही एक चांगली संधी आहे... स्वतःला जाणून घेण्याची.
नंतर आपण पुन्हा त्या धकाधकीच्या आयुष्यात पाऊल ठेवणार आणि पुन्हा वेळ मिळत नाही; म्हणून रडत बसणार. त्यामुळेच या वेळेत आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करायला हव्यात. दिवस मोजत बसण्यापेक्षा या मोकळ्या दिवसांचा चांगला उपयोग करायला हवा. आपल्या काही आवडत्या कलांना मोकळी वाट करून देऊ या आणि सकारात्मक राहू या. हेही कठीण दिवस नक्की जातील. फक्त संयम ठेवायला हवा.
लिखाण, वाचन सुरू
जेव्हा सुट्टी असेल, तेव्हा मी खूप दिवसांपासून राहिलेली कामे करते. कपाट व्यवस्थित आवरणे. लेख लिहिणे, वाचन करणे. या सगळ्या गोष्टींना खरेच या आधी वेळ मिळत नव्हता; पण आता तो वेळ मिळतोय.