म. टा. प्रतिनिधी, पुणे
देशरक्षणासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता तसेच देशात महापूर, भूकंप आणि आपत्कालीन परिस्थितीतीन अनेकांची जीव वाचविण्यासाठी भारतीय सेना नेहमीच तत्परतेने काम करते. त्यांच्या या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सेनेतील जवान, उच्च आधिकारी आणि वीर पत्नींचा अभि चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने गौरव करण्यात आला. या वेळी कर्नल विक्रम पत्की, कर्नल एस. पी. शुक्ला, कर्नल अनिल लाल, मेजर मिलिंद तुंगार, ऑनररी कॅप्टन जे. पी सिंग, हवालदार प्रल्हादजगताप, नवनाथ मुऱ्ये, पंडित शिंदे, बाबासाहेब तरडे, कैलाश काळे तसेच वीरपत्नी लक्ष्मी साळुंके, सोनाली फटके आणि जोत्स्ना गर्गे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला भक्ती जमदग्नी, अभिषेक जोशी, दीपाली गडकरी उपस्थित होते. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र जोशी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.
.
गुणवंतांचा गौरव
सनातन दशनाम गोसावी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिके व सायकली देऊन गौरव करण्यात आला. या वेळी शिवचरित्र व्याख्याते यशवंत गोसावी यांचा अखिल भारतीय गोस्वामी सभेतर्फे समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच, राज्य प्रदेश युवा अध्यक्ष पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी अखिल भारतीय गोस्वामी समाजाचे अध्यक्ष बाळकृष्ण पर्वत यांनी नागपूरमधील सनातन दशनाम गोसावी समाजाला आपल्या मालकीची २.५ कोटी किमतीची जमीन मंदिर उभारणीसाठी देणगी म्हणून दिली.
.
काव्य संमेलनाचे आयोजन
शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून साहित्यप्रकाश संस्थेच्या वतीने मासिक काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते. घन:श्याम पाटील संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी राहुल भोसले, बाबा ठाकूर, ऋचा कर्वे, संध्या गोळे, वसंत गोखले अशा एकूण २४ कवींनी कविता सादर केल्या.
.
जनक्रांती आंदोलन
नवी दिल्लीत संविधान जाळणाऱ्यांचा निषेध करण्यासाठी दलित पँथर ऑफ इंडियाच्या वतीने 'संविधान जनक्रांती आंदोलन' करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रनिष्ठेची शपथ घेण्यात आली. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी बापू भोसले, संघराज गायकवाड, महादेव गायकवाड, द्रौपदी पाटील, वंदना दरपेल्ली, राहुल भोसले आदी उपस्थित होते.
.
संरक्षण कायद्याची मागणी
बलुतेदार समाजाच्या व्यावसायिकांवर होणारे हल्ले लक्षात घेऊन बारा बलुतेदार समाज विकास संघाच्या वतीने बलुतेदार संरक्षण कायद्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ओबीसी मंत्रालयातून बलुतेदारांना स्वतंत्र आर्थिक तरतूद मिळावी, मृत बलुतेदारांच्या कुटुंबीयांनी आर्थिक मदत मिळावी, नाभिक बांधव मारहाण प्रकरणातल्या आरोपींना अटक व्हावी आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. या वेळी रामदास सूर्यवंशी, सचिन उदावंत, माउली रायकर, विशाल वाळुंजकर, नितीन भुजबळ, चंद्रकांत बावीस्कर, राजेश भोसले, राजेंद्र पंडित, रोहित यवतकर आदी उपस्थित होते.