‘चिंटू’ने जागवल्या आजोबा, वडिलांच्या आठवणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘मेरा नाम जोकर या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेसाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याची ट्रॉफी घरी आणल्यानंतर साहेबांनी (राज कपूर) आजोबांचे आशीर्वाद घ्यायला सांगितले. मी त्यांच्या खोलीत गेलो; नमस्कार केला आणि ट्रॉफी त्यांच्या हातात दिली. त्यांनी प्रेमाने मला आणि त्या ट्रॉफिला न्याहाळले. त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळत होते. ट्रॉफी आपल्या कपाळी लावत ते पुटपुटले, ‘राजने मेरा कर्जा उतार दिया,’ त्या दिवशी खऱ्या अर्थाने माझे आजोबा मला कळले, अशी हृदयद्रावक आठवण सांगून ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर वडील राज कपूर आणि आजोबा पृथ्वीराज कपूर यांच्या आठवणीत रमून गेले. माझे वडील चित्रपटाच्या दुनियेतील एक समृद्ध अशी संस्था होती. त्यांच्या चित्रपटांचे रिमेक करण्याचा आम्ही विचारही करू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सोळाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत सुरू असलेल्या ‘पिफ फोरम’मध्ये आयोजित कार्यक्रमात ऋषी कपूर यांनी कपूर घराण्यातील अभिनय आणि चित्रपटांचा प्रवास उलगडला. ‘मी पृथ्वीराज कपूर यांच्यासारख्या कलाकाराचा नातू, राज कपूर यांचा मुलगा आणि रणबीरसारख्या गुणी अभिनेत्याचा बाप आहे, यापेक्षा विलक्षण समाधान काय असावे,’ असे सांगताना ऋषी कपूर गहिवरले. ‘पिफ’चे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
‘कपूर घऱाण्यातील कलाकारांना प्रेक्षकांनी मोठे केले. माझ्या आजोबांपासून ते अगदी रणबीर, करिनापर्यंत कपूर घराण्याची चौथी पिढी चित्रपटांमध्ये कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी कपूर घराण्याच्या या चित्रप्रवासाला नव्वद वर्षे पूर्ण झाली. राज कपूर, पृथ्वीराज कपूर यांनी चित्रपट क्षेत्रामध्ये केलेले कार्य खूप मोठे आहे. राज कपूर हे माझे सर्वार्थाने गुरू होते. मेरा नाम जोकरमध्ये केवळ त्यांनी सांगितलेल्या गोष्टींची नकल करून मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अकबर बादशहा या पात्रावर देशात अनेक चित्रपट तयार झाले; पण पृथ्वीराज कपूर यांनी साकारलेला अकबर कोणीही साकारू शकत नाही, असेही ऋषी कपूर यांनी सांगितले.
‘चिंटू मुझे युसूफ चाहिए....’
बऱ्याच वर्षांनी राज कपूर दिग्दर्शन करत असलेल्या ‘प्रेमरोग’ या चित्रपटात मी भूमिका साकारत होतो. एक सीन करत असताना राज कपूर मला उद्देशून जोरात ओरडले, ‘चिंटू मुझे युसूफ चाहिए युसूफ...’ अभिनेते दिलीप कुमार यांच्यासारखे भाव चेहऱ्यावर आणायला ते सांगत असल्याने मला काही काळ आश्चर्य वाटले. पण, स्पर्धक जरी असला तरी त्याचे चांगले गुण आत्मसात करण्यावर त्यांचा भर होता. या शब्दांत ऋषी कपूर यांनी राज कपूर यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
आजोबांचे पात्र कसे साकारू?
ऋषी कपूर यांनी शनिवारी त्यांच्या चित्रीकरणादरम्यानचे अनेक किस्से रंगवले. ऋषी कपूर काही अभिनेत्यांसह बिकानेरमध्ये चित्रिकरण करीत होते. एक दिवशी सायंकाळी त्यांच्या नावे मुंबईवरून फोन आला. मनमोहन देसाई यांनी फोन केला होता. त्या वेळी नेटवर्कच्या फारशा सुविधा नसल्याने फोनवरच्या संभाषणांमध्ये अनेकदा अडथळे येत होते. आपण ‘अमर-अकबर-अँथनी’ हा नवा चित्रपट काढणार असून, ऋषी कपूर यांना अकबरची भूमिका साकारायची आहे, असे देसाई यांनी कपूर यांना सांगितले. ऋषी कपूर यांनी फक्त अकबरचे पात्र साकारायचे आहे. एवढेच ऐकले. ते लगेच फोनवरून ओरडले, ‘माझ्या आजोबांनी अजरामर केलेले पात्र मी कसे साकारू’... कपूर यांनी हा किस्सा सांगितल्यानंतर सभागृहात हास्यात बुडून गेले.
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘मेरा नाम जोकर या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेसाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याची ट्रॉफी घरी आणल्यानंतर साहेबांनी (राज कपूर) आजोबांचे आशीर्वाद घ्यायला सांगितले. मी त्यांच्या खोलीत गेलो; नमस्कार केला आणि ट्रॉफी त्यांच्या हातात दिली. त्यांनी प्रेमाने मला आणि त्या ट्रॉफिला न्याहाळले. त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळत होते. ट्रॉफी आपल्या कपाळी लावत ते पुटपुटले, ‘राजने मेरा कर्जा उतार दिया,’ त्या दिवशी खऱ्या अर्थाने माझे आजोबा मला कळले, अशी हृदयद्रावक आठवण सांगून ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर वडील राज कपूर आणि आजोबा पृथ्वीराज कपूर यांच्या आठवणीत रमून गेले. माझे वडील चित्रपटाच्या दुनियेतील एक समृद्ध अशी संस्था होती. त्यांच्या चित्रपटांचे रिमेक करण्याचा आम्ही विचारही करू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सोळाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत सुरू असलेल्या ‘पिफ फोरम’मध्ये आयोजित कार्यक्रमात ऋषी कपूर यांनी कपूर घराण्यातील अभिनय आणि चित्रपटांचा प्रवास उलगडला. ‘मी पृथ्वीराज कपूर यांच्यासारख्या कलाकाराचा नातू, राज कपूर यांचा मुलगा आणि रणबीरसारख्या गुणी अभिनेत्याचा बाप आहे, यापेक्षा विलक्षण समाधान काय असावे,’ असे सांगताना ऋषी कपूर गहिवरले. ‘पिफ’चे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
‘कपूर घऱाण्यातील कलाकारांना प्रेक्षकांनी मोठे केले. माझ्या आजोबांपासून ते अगदी रणबीर, करिनापर्यंत कपूर घराण्याची चौथी पिढी चित्रपटांमध्ये कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी कपूर घराण्याच्या या चित्रप्रवासाला नव्वद वर्षे पूर्ण झाली. राज कपूर, पृथ्वीराज कपूर यांनी चित्रपट क्षेत्रामध्ये केलेले कार्य खूप मोठे आहे. राज कपूर हे माझे सर्वार्थाने गुरू होते. मेरा नाम जोकरमध्ये केवळ त्यांनी सांगितलेल्या गोष्टींची नकल करून मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अकबर बादशहा या पात्रावर देशात अनेक चित्रपट तयार झाले; पण पृथ्वीराज कपूर यांनी साकारलेला अकबर कोणीही साकारू शकत नाही, असेही ऋषी कपूर यांनी सांगितले.
‘चिंटू मुझे युसूफ चाहिए....’
बऱ्याच वर्षांनी राज कपूर दिग्दर्शन करत असलेल्या ‘प्रेमरोग’ या चित्रपटात मी भूमिका साकारत होतो. एक सीन करत असताना राज कपूर मला उद्देशून जोरात ओरडले, ‘चिंटू मुझे युसूफ चाहिए युसूफ...’ अभिनेते दिलीप कुमार यांच्यासारखे भाव चेहऱ्यावर आणायला ते सांगत असल्याने मला काही काळ आश्चर्य वाटले. पण, स्पर्धक जरी असला तरी त्याचे चांगले गुण आत्मसात करण्यावर त्यांचा भर होता. या शब्दांत ऋषी कपूर यांनी राज कपूर यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
आजोबांचे पात्र कसे साकारू?
ऋषी कपूर यांनी शनिवारी त्यांच्या चित्रीकरणादरम्यानचे अनेक किस्से रंगवले. ऋषी कपूर काही अभिनेत्यांसह बिकानेरमध्ये चित्रिकरण करीत होते. एक दिवशी सायंकाळी त्यांच्या नावे मुंबईवरून फोन आला. मनमोहन देसाई यांनी फोन केला होता. त्या वेळी नेटवर्कच्या फारशा सुविधा नसल्याने फोनवरच्या संभाषणांमध्ये अनेकदा अडथळे येत होते. आपण ‘अमर-अकबर-अँथनी’ हा नवा चित्रपट काढणार असून, ऋषी कपूर यांना अकबरची भूमिका साकारायची आहे, असे देसाई यांनी कपूर यांना सांगितले. ऋषी कपूर यांनी फक्त अकबरचे पात्र साकारायचे आहे. एवढेच ऐकले. ते लगेच फोनवरून ओरडले, ‘माझ्या आजोबांनी अजरामर केलेले पात्र मी कसे साकारू’... कपूर यांनी हा किस्सा सांगितल्यानंतर सभागृहात हास्यात बुडून गेले.