अ‍ॅपशहर

पालकमंत्री, महापौर यांच्यात कलगीतुरा

‘महापौर, पाणी वाचविण्यासाठी तुम्ही काय केले?, पाण्याची काटकसर करण्यासाठी पालिकेचा प्रतिसाद कमी आहे, पाणीगळती रोखण्यावर महापालिकेने खर्च का केला नाही,’ पालकमंत्री गिरीश बापट यांनी शहरातील पाण्याच्या नियोजनावरून पालिकेच्या कारभाऱ्यांना शनिवारी कालवा समितीच्या बैठकीत चांगलेच फैलावर घेतले.

Maharashtra Times 24 Apr 2016, 4:12 am
शहरात आणखी पाणीकपात नाही : महापौर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम water crisis meeting pune mayor guardian minister
पालकमंत्री, महापौर यांच्यात कलगीतुरा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘महापौर, पाणी वाचविण्यासाठी तुम्ही काय केले?, पाण्याची काटकसर करण्यासाठी पालिकेचा प्रतिसाद कमी आहे, पाणीगळती रोखण्यावर महापालिकेने खर्च का केला नाही,’ पालकमंत्री गिरीश बापट यांनी शहरातील पाण्याच्या नियोजनावरून पालिकेच्या कारभाऱ्यांना शनिवारी कालवा समितीच्या बैठकीत चांगलेच फैलावर घेतले.
पालकमंत्र्यांच्या या टीकेला महापौर प्रशांत जगताप यांनीही पुणेकरांनी गेल्या आठ महिन्यांत केलेल्या पाणीबचतीची आकडेवारी सादर करून चोख प्रत्युत्तर दिले. शहरात सप्टेंबर महिन्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीवापरासाठी आयोगाने दिलेल्या आदेशांनुसार शहरात पाणीवापर होत आहे. सद्य परिस्थितीत खडकवासला प्रकल्पामध्ये उरलेले पाणी शहराच्या हक्काचे आहे. त्यातून दौंड, इंदापूर यांना पाणी सोडायचा निर्णय झाल्यास शहराला पाणी पुरणार नाही, अशी वस्तुस्थितीही महापौरांनी मांडली.
‘पुणेकरांनी दिवसाआड पाणीपुरवठा सहन करून पाणीबचत केली. इतकेच नव्हे तर, बेबी कालव्यात प्रक्रिया केलेले एक टीएमसी पाणी शेतीसाठी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पुणे शहरात सध्यापेक्षा अधिक पाणीकपात करणे अशक्य आहे,’ अशी ठोस भूमिकाही महापौरांनी घेतली. ‘पालिकेने शहराच्या पाण्यात कपात केलेली नाही. पाणी वाचविण्यासाठी पालिकेचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. पाणी गळती रोखण्यावरही पालिका खर्च करीत नाही. पालिकेने पालकमंत्र्यांचे ऐकायचेच नाही हे ठरविलेले दिसते. पण ग्रामीण भागात पिण्यासाठी पाणी देणे गरजेचे आहे. पालकमंत्री म्हणून याबद्दल निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे पालिकेने पाणीवापरात आणखी किती काटकसर करता येईल याचे नियोजन करावे,’ अशी सूचना बापट यांनी केली. खडकवासल्याच्या कालव्यातून होणाऱ्या पाणीगळतीची आपण पाहणी करणार आहोत. त्यातून किती पाणी वाचवता येईल हे पाहून दौंड आणि इंदापूरला पाणी देण्याविषयी निर्णय घेण्यात येईल. हे पाणी ग्रामीण भागाला सोडताना कालव्यावरचे वीजपंप काढण्याबरोबरच बंदोबस्तही ठेवण्यात येणार असल्याचे नियोजन पालकमंत्र्यांनी बैठकीत जाहीर केले.
..
‘वाढीव पाणीकपातीला विरोध करू’
दरम्यान, खडकवासला धरणात शहराला १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यामध्ये आणखी पाणीकपात करू शकत नाही. या संदर्भात महापालिकेच्या पक्षनेत्यांची बैठक घेऊन कपातीला विरोध करणार असल्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज