अ‍ॅपशहर

पाण्यासाठी वणवण

वेल्हे तालुक्यातील वरोती खुर्द व बुद्रुक येथे सार्वजनिक नळयोजनेचे पाणी मिळत नसल्यामळे महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नळपाणी योजना बंद असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

Maharashtra Times 20 Apr 2017, 3:00 am
वरोती गावात सार्वजनिक नळयोजना बंद; पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम water shortage in velhe
पाण्यासाठी वणवण

म. टा. वृत्तसेवा, भोर
वेल्हे तालुक्यातील वरोती खुर्द व बुद्रुक येथे सार्वजनिक नळयोजनेचे पाणी मिळत नसल्यामळे महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नळपाणी योजना बंद असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
वरोती खुर्द गावातील महिलांना पाणी आणण्यासाठी तीन किलोमीटर अंतरावरील कोळंबी गावात जावे लागते. भर उन्हात या महिला डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी पायपीट करत आहेत. वरोती बुद्रुक गावातील महिलांना दीड किलोमीटर अंतरावरील बंधाऱ्यातून पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. वरोती खुर्द, वरोती बुद्रुक, कोलंबी या गावांसाठी पंधरा वर्षांपूर्वी पिण्याच्या पाण्याची संयुक्त नळपाणी पुरवठा योजना कोळंबी गावच्या विहीरीवर राबविण्यात आली. त्यातून दोन्ही वरोती गावांना पाइपलाइनमधून पाणी नेण्यात आले. परंतु वरोती बुद्रकला नळपाणी योजना झाल्यापासून पाणीच आले नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.
वरोती खुर्दला डिसेंबरपर्यंत कसेबसे पाणी मिळते. सदोष योजना व निकृष्ट कामांमुळे योजनेचा अपेक्षित लाभ गावकऱ्यांना झालाच नाही. वरोती खुर्द येथे दोन विहिरी खोदलेल्या आहेत. परंतु विहिरीची खोली जेमतेम पंधरा ते वीस फूट खोल आहे. त्यामुळे त्यामध्ये दिवाळी नंतर पाणी शिल्लक राहत नाही. आता त्या विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत. त्यातील झऱ्यातून तासाभरात एखादा हंडाभर पाणी साठते. त्यासाठी डोळ्यात तेल घालून पाणी साठण्याची वाट पाहावी लागते. गावच्या ओढ्यावर दोन बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यातील एका ओढ्यात एकदाही पाणी साठले नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.
दुसऱ्या बंधाऱ्याला गळती असल्यामुळे त्यात पाणी राहत नाही. सध्या त्याच्या दुरुस्तीचे काम चालू आहे. तिसऱ्या बंधाऱ्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये ग्रामस्थ लक्ष घालत आहेत. गेल्या वर्षी तीव्र पाणी टंचाई होती. पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडे टॅकरने पाणी पुरवावे, अशी मागणी करूनही पाणी मिळाले नाही. स्वयंसेवी संस्थानी पावसाळ्यापर्यंत कसे तरी पाणी पुरवल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. नवीन बंधाऱ्यांच्या खाली वरोती खुर्दला पाण्यासाठी पुण्यातील ज्ञान प्रबोधिनीच्या पुढाकाराने विहिरीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्या विहिरीला पाणी लागले आहे. त्यामुळे पुढील वर्षी तेथील पाणी प्रश्न मार्गी लागेल अशी आशा आहे. मात्र, सध्या तरी गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे.
००
उदासीनता आणि कुपनलिका
वरोली गावाच्या परिसरात पुणे, मुंबई आदी शहरांमधील धनिकांची रो हाउसेस आणि बंगले आहेत. त्यासाठी डोंगर खणण्यात आले आहेत. या बंगल्यांच्या आवारात तीनशे ते चारशे फूट खोलीच्या कूपनलिका खोदण्यात आल्या आहेत.
काही जणांनी विहिरी, तळी खोदली आहेत. त्यामुळे भूगर्भातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे गावातील विहिरींचेही पाणी आटले आहे. सार्वजनिक पाणी पिण्याच्या जलस्रोताच्या एक किलोमीटर परिसरांत वैयक्तिक कूपनलिका, विहिरी बांधता येत नाहीत. मात्र, ग्रामपंचायतीने केलेल्या दुलर्क्षामुळे हा नियम सर्रास तोडल्याचे दिसून येत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज