म. टा. प्रतिनिधी, पुणे
खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्याद्वारे जिल्ह्यात शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू असून, आणखी १० दिवस आवर्तन राहणार आहे. त्यानंतर धरणातील उपलब्ध पाणीसाठा पाहून दुसरे उन्हाळी आवर्तन घ्यायचे की नाही, याचे नियोजन करण्यात येणार आहे. सध्या पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या तीन धरणांमध्ये ९.८२ अब्ज घन फूट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे.
जलसंपदा विभागाने शेतीसाठी ३१ मार्चपासून ४० दिवसांचे उन्हाळी आवर्तन सुरू केले आहे. या कालावधीत सुमारे पाच टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर वगळता अन्य तीन धरणांमध्ये ३१ मार्च रोजी १५.३४ टीएमसी पाणीसाठा होता. आता तो ९.८२ टीएमसीपर्यंत आला आहे. सध्या खडकवासला धरणात १.२९ टीएमसी, पानशेत धरणात ४.५८ टीएमसी, वरसगाव धरणात ३.९५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. टेमघर धरण दुरुस्तीसाठी रिकामे करण्यात आले आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे एक टीएमसी पाणीसाठा जास्त आहे. गेल्या वर्षी या सुमारास सुमारे नऊ टीएमसी पाणी शिल्लक होते. सध्या मुठा उजवा कालव्यातून दौंड, इंदापूर, बारामती आणि जिल्ह्याच्या अन्य भागांसाठी पाणी पुरविण्यात येत आहे. गेल्या वर्षी पाणीसाठा कमी असल्याने दुसरे उन्हाळी आवर्तन रद्द करण्यात आले होते. यंदा दुसरे उन्हाळी आवर्तन घ्यायचे की नाही, याबाबत १० दिवसांनी निर्णय घेण्यात येणार आहे. कालवा समितीतील चर्चेनुसार दुसऱ्या उन्हाळी आवर्तनात सुमारे चार टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
उजनीत अवघे अर्धा टीएमसी पाणी
सोलापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे उजनी धरण यंदा पावसाळ्यात काठोकाठ भरले होते. मात्र, सध्या या धरणात उपयुक्त पाणीसाठा अवघा अर्धा टीएमसी शिल्लक राहिला आहे. या धरणाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता ५३.५७ टीएमसी असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
सध्या मुठा उजव्या कालव्यातून आवर्तन सुरू असून, आणखी १० दिवस आवर्तन सुरू राहणार आहे. कालव्यातून पाच टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन आहे. आवर्तन थांबविण्यात आल्यावर धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा पाहून दुसरे उन्हाळी आवर्तन घ्यायचे की नाही, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
- विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग
धरण पाणीसाठा टक्के
वरसगाव ३.९५ ३०.८२
पानशेत ४.५८ ४२.९८
खडकवासला १.२९ ६५.४८
टेमघर -- --
पवना ३.५४ ४१.६६
डिंभे ४.२३ ३३.८४
चासकमान २.३६ ३१.१५
भामा आसखेड ३.७९ ४९.४८
गुंजवणी ०.९० २४.३५
नीरा देवघर ४.१० ३४.९२
भाटघर ८.९४ ३८.०३
वीर ४.७८ ५०.७७
उजनी ०.५३ ०.९८