म. टा. प्रतिनिधी, पुणे
अयोध्येतील श्रीराम मंदिर खटल्याच्या निकालावर प्रक्षोभक मजकूर 'व्हॉट्स अॅप'वर फॉरवर्ड केल्यास ग्रुपच्या अॅडमिनवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शुक्रवारी संध्याकाळपासून वाऱ्यासारखा फिरला आणि बघता बघता बहुतांश व्हॉटस् ग्रुप अचानक 'अॅडमिन ओन्ली' मोडवर गेले. सोशल मीडियावरील घडामोडींवर आमची नजर राहणार असल्याचे पोलिसांनी जाहीर केल्यामुळे लोकांनी 'इनअॅक्टिव्ह' राहणे पसंत केले. त्यामुळे चर्चेचा दिवस असूनही आज अनेकांचे व्हॉट्स दिवसभर शांत होते.
देशात कोणतीही मोठी घडामोड घडली की सोशल मीडियावर ती काही वेळात पसरते आणि यातून अनेक अफवा पसरवल्या जात असल्याचे प्रशासनाच्या सातत्याने निदर्शनास येते आहे. दोन महिन्यांपूर्वी आलेल्या पुराच्या वेळीदेखील दुसऱ्या राज्यातील पुराचे फोटो खोटी माहिती देऊन 'व्हायरल' झाले होते. इतरही गंभीर घटनांच्या बाबतीत खोट्या बातम्या पसरवून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे अयोध्येच्या निर्णयाचे गांभीर्य ओळखून राज्याच्या विविध भागांतील पोलिसांनी स्थानिक पातळीवर व्हॉटस् अॅप ग्रुपवर प्रशोभक विधाने करणाऱ्यांवर, तसेच ग्रुपच्या प्रमुखावर कारवाई करण्यात येईल, असे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले होते. पोलिसांचे सोशल मीडियावरही लक्ष राहणार असल्याचे पत्रात म्हटले होते.
पोलिसांचे हे पत्रदेखील शुक्रवारी संध्याकाळी शेकडो ग्रुपवर व्हायरल झाले. लोकांच्या प्रतिक्रिया थांबवता येणार नसतील, तर ग्रुप प्रमुखाने काही दिवस ग्रुप 'अॅडमिन ओन्ली' करा, असा सल्ला पोलिसांनी दिला होता. त्यामुळे लोकांनी हाच पर्याय निवडला, रात्रीनंतर अनेकांनी ग्रुपवर पोलिसांचा संदेश टाकून ग्रुप प्रमुखाने सभासदांचे पोस्ट टाकण्याचे अधिकार रोखले. परिणामी अयोध्येचा निकाल लागल्यानंतरही व्हॉटस् अॅप ग्रुप शांतच होते. लोकांनी फोनवर बोलून एकमेकांच्या भावना व्यक्त केल्या. दिवसभरात कोणतेही जोक, प्रतिक्रिया, जीआयएफ, व्यंगचित्रे, चारोळ्या ग्रुपवर फिरल्या नाहीत. पोलिसांच्या कारवाईचा धसका घेतल्यामुळे सोशल मीडियावरदेखील लोकांनी मोजक्याच आणि संयमी प्रतिक्रिया देणे पसंत केले.
०००