म. टा. प्रतिनिधी, पुणे
आम्हाला काही फरक पडत नाही।
जोवर आमचे कुणी जात नाही।।
आपल्याला काय होतंय
आपण जगाचे राजे आहोत।
ग्रस्त असतील कोमेजलेले; पण
आपण तर टवटवीत ताजे आहोत।।
'करोना'मुळे काहीच होत नाही. हा रोग आपल्याला काहीच करणार नाही, असा समज करून खुशाल घराबाहेर हिंडणाऱ्या नागरिकांच्या डोक्यात प्रकाश पडावा; म्हणून कलाकार सरसावले आहेत. एका कवितेचा व्हिडिओ तयार करून, मराठी चित्रपट, नाट्य आणि टीव्हीसृष्टीतील कलावंतांनी समाजमाध्यमांवर पोस्ट केला आहे. 'करोना'मुळे जगभर ओढवलेल्या परिस्थितीचा आढावा या कवितेत घेतला असून, त्याद्वारे नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
युवा लेखक अक्षय जोशी याच्या लेखणीतून ही कविता साकारली गेली आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांनी या कवितेचा व्हिडिओ करण्याची संकल्पना आखली आणि कलाकारांनी त्याला साथ दिली. गौरव मोरे, वनिता खरात, ओंकार भोजने, समीर चौगुले, विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळे, अंशुमन विचारे, प्रसाद खांडेकर, सुहास परांजपे, अरुण कदम, प्रभाकर मोरे, श्याम राजपूत, सचिन मोटे, सचिन गोस्वामी, अक्षय जोशी, नम्रता संभेराव, प्राजक्ता माळी, अमीर हडकर, चेतना भट या कलाकारांनी व्हिडिओद्वारे कवितेच्या शब्दांतून नागरिकांना आवाहन केले आहे.
कोणत्याही परिस्थितीत बाहेर पडू नका, असे सांगून कलावंतांनी जगभरातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. सध्या सगळीकडे 'वर्क फ्रॉम होम' सुरू आहे. हा व्हिडिओदेखील सर्व कलावंतांनी घरी बसूनच तयार केला आहे. खांडेकर यांनी तो संकलित केला असून, तो एकत्र जोडून त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. नागरिकांना आवाहन करीत असताना त्यांना कळकळीने काळजी घेण्याची विनंती करणारा हा कलाकारांचा प्रयत्न सगळीकडे 'व्हायरल' होत आहे.
ही कविता लिहावी वाटली; कारण मी स्वतः धायरीत राहतो. आमच्या येथे रात्री अॅम्ब्युलन्सचा आवाज यायचा आणि दुसऱ्या दिवशी आमच्या परिसरात 'करोना'चे रुग्ण वाढलेले कळायचे; तरीही लोक बाहेर पडत होते. पोलिसांनी त्यांना मारायला सुरुवात केली आणि मग त्याचे मला वाईट वाटले; म्हणून नागरिकांना विनंती करण्याच्या हेतूने मी लिहिले आणि काही मित्रांना कविता पाठवली. प्रसाद खांडेकरला त्याचा व्हिडिओ करायची कल्पना सुचली आणि ती कलाकारांमार्फत प्रत्यक्षात आणली.
- अक्षय जोशी, लेखक-कलावंत