म. टा. प्रतिनिधी, पुणे
पावसाळा सुरू झाल्यावर निसर्ग पर्यटनाला उधाण येत असेल, तरी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी येत्या १ जुलैपासून राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्प आणि बहुतांश अभयारण्ये सुट्टीवर जाणार आहेत. पावसाळा संपल्यानंतर १ ऑक्टोबरला पुन्हा अभयारण्यांचे दरवाजे उघडतील. पावसाळ्यात वाढलेल्या गवतामुळे अभयारण्यातील पायावाटा पुसल्या जातात; तसेच गाड्या चिखलात रुतण्याची शक्यता असते. त्यामुळे अभयारण्ये पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे.
गेल्या काही वर्षांत जंगल पर्यटनाची क्रेझ वाढल्याने उन्हाळ्यात कितीही उकाडा आणि उन्हाचे चटके बसले; तरीही लोक व्याघ्र पर्यटन करत आहेत. हिवाळ्यातही राज्यातील बहुतांश अभयारण्यांमधील 'जंगल सफारी' दोन महिने आधीच 'फुल' होत आहेत. हिवाळा आणि उन्हाळ्यात जंगलात वाहन घेऊन अथवा चालत फिरणे सुरक्षित असते. मात्र, जोरदार पाऊस सुरू झाल्यावर गवत वेगाने वाढते आणि सगळ्या पायवाटा पुसल्या जाण्याची शक्यता असते. अनेकदा या रस्त्यांवर झाडे कोसळतात, तर चिखलामुळे गाड्या रस्त्यात अडकून पडतात. दाट धुक्यामुळे भटकंतीसाठी जाणाऱ्या पर्यटकांची वाट चुकण्याचीही शक्यता असते.
पावसामुळे होणारे असे अपघात टाळण्यासाठी वन विभागातर्फे दर वर्षी जूनअखेरीस किंवा एक जुलैपासून पर्यटन थांबविण्यात येते. या वर्षी अजून मान्सून दाखल झाला नसल्यामुळे अभयारण्ये अजून सुरू आहेत. मात्र, १ जुलैपासून सर्व व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्ये पर्यटनासाठी बंद करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे.
ताडोबाचा 'बफर झोन' खुला
पावसाळ्याचा हंगाम सुरू झाला असली, तरी व्याघ्र प्रकल्पांतील पर्यटकांची संख्या अद्याप ओसरलेली नाही. पर्यटकांची वाढती मागणी लक्षात घेऊन, व्याघ्र प्रकल्पांमधील बफर झोन पावसाळ्यातही सुरू ठेवावेत, अशी मागणी गेल्या वर्षी अनेकांनी केली होती. त्यानुसार वन विभागाने काही अभयारण्यांची डांबरी रस्ता असलेली गेट खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा ताडोबातील बफर झोनमधील १३पैकी आठ गेट सुरू राहतील. नवेगावमधीलही एक तो दोन मार्ग सुरू ठेवण्याचा विचार आहे; पण पावसाचा जोर वाढल्यास बंदी करण्यात येईल. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पायवाटा असल्याने पर्यटक जाऊ शकत नाहीत. सर्वच अभायरण्यांचे गाभा क्षेत्र पर्यटकांसाठी बंद असतील, अशी माहिती अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिली.
धुक्यात सावध राहण्याची गरज
पश्चिम घाटातील अभयारण्यांना जूनच्या पहिल्याच आठवड्यात धुक्याने व्यापले आहे. कोयना, चांदोली, राधानगरी, भीमाशंकरमध्ये मोठ्या प्रमाणात गवत आणि झुडपे वाढली आहेत. पायवाटा पुसल्या गेल्या आहेत. जळवा आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे वनक्षेत्रात फिरणे अवघड आहे. पुणे विभागालगतच्या भीमाशंकर, ताम्हिणी, रेहकुरी अभायरण्यांत दर वर्षी पर्यटक पावसाळ्यात फिरायला जातात. भीमाशंकर अभयारण्यात कोंढवळ, वनस्पती पाइंट, भोरगिरी या भागात ट्रेकिंगला लोक येतात. धबधब्यांसाठी पर्यटकांची गर्दी होते. पर्यटकांनी अनोळखी वाटांवर भटकंतीसाठी पर्यटकांनी फिरायला जाऊ नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.