'संविधान बचाव रॅली'त सहभागींचा निर्धार
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'केंद्रातील मोदी सरकारने केलेले कायदे आम्हाला भारतीय समजत नाहीत, त्यामुळे आम्ही हे कायदे मानणार नाही. कायद्यांविरोधात आम्ही घटनात्मक चौकटीत लढा देऊ,' असा निर्धार करून हजारो नागरिकांनी रविवारी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी मोहीम (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीच्या (एनपीआर) अंमलबजावणीला विरोध दर्शविला. 'चार मिनार, कुतुब मिनार आणि लाल किल्ला हीच आमची कागदपत्रे आहेत, आम्ही कोणतीही कागदपत्रे दाखविणार नाही,' असा निर्धारही त्यांनी केला.
'कुल जमाते तंजीम' आणि 'सीएए, एनआरसीविरोधी महारॅली नियोजन समिती'तर्फे 'सीएए आणि एनआरसीविरोधात संविधान बचाव, देश बचाव महारॅली'चे रविवारी आयोजन करण्यात आले होते. गोळीबार मैदानापासून रॅलीला प्रारंभ झाला. मुस्लिम समाजातील विविध पंथांचे उलेमा, महिला आणि विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था-संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. हातात तिरंगा आणि फलक घेऊन आंदोलक 'संविधान बचाव, देश बचाव', 'आम्हाला नोकरी रोजगार द्या, सीएए-एनआरसी नको' अशा घोषणा देत होते. कृष्णराव ढोले चौकातून नेहरू रस्त्यामार्गे विधान भवन येथे रॅलीचे सभेत रुपांतर झाले. या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर, माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील, 'जेएनयू'तील विद्यार्थी नेता उमर खालिद, शाहिद अहमद, नगरसेवक हाजी गफूर पठाण, मुनव्वर कुरेशी, जाहिद शेख, हाजी मंजूर शेख, राहुल डंबाळे, नीरज जैन, तस्लीम रेहमानी या वक्त्यांनी मनोगत व्यक्त करताना केंद्र सरकार धर्माधर्मांत फूट पाडत असल्याची टीका केली. सरकारने संसदेत नवे विधेयक आणून, नागरिकत्व कायद्यातील कलम १४ (ए) रद्द करावे, संयुक्त राष्ट्र अधिवेशन १९५५ अंतर्गत शरणार्थी, निर्वासितांना नागरिकत्व देण्यासाठी वेगळा कायदा तयार करावा, एनआरसीचे प्रश्न वगळून एनपीआर मोहीम राबवावी, अन्यथा केरळ व बंगालच्या धर्तीवर महाराष्ट्रात एनपीआरची अंमलबजावणी करू नये, विद्यार्थी आंदोलकांवर केलेली कारवाई मागे घ्यावी, अशा मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या.
मोर्चा मार्गावरील वाहतूक सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली होती. स्वारगेट, कॅम्प परिसर, भवानी पेठ आणि पुणे स्थानक परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले होते. याशिवाय मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
......
'आपला भारत कोणत्याही एका जातीचा, धर्माचा, भाषेचा नाही. विविध संस्कृती मिळून-मिसळून एकत्र नांदतात, हेच भारताचे वैशिष्ट्य आहे. त्यातूनच लोकशाही रुजली आहे. मात्र, सीएए, एनआरसी आणि एनपीआरद्वारे त्यावरच हल्ला केला जात आहे. धर्मनिरपेक्ष राष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्म्यांच्या हौतात्म्यावरील हा हल्ला आहे. त्याविरोधात मानवता वाचविण्यासाठी आंदोलन केले जात आहे. अहिंसा आणि सत्याग्रह मार्गानेच हे आंदोलन करा. त्यांनी लाठी उगारली, तर आपण तिरंगा उंचवू.
- उमर खालिद,