म. टा. प्रतिनिधी, हडपसर
'काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी मोहिमेला (एनआरसी) विरोध असून, असा कायदा करून केंद्र सरकार देशामध्ये जातीयवाद पसरवत आहे. त्यामुळे देशात अशांतता निर्माण झाली आहे. हा कायदा रद्द झाला नाही, तर इंग्रजांविरोधात उभारलेल्या असहकार आंदोलनाप्रमाणे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करू,' असा इशारा समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी कोंढव्यात दिला.
'सीएए' आणि 'एनआरसी'विरोधात कोंढव्यात बारा दिवसांपासून महिलांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आझमी बोलत होते. आझमी म्हणाले, 'केंद्र सरकारने मनमानी कारभार सुरू केला आहे. सरकारने घेतलेला निर्णय तातडीने मागे घेतला पाहिजे. सरकार ऐकत नसेल, तर या पुढे 'करो या मरो'ची रणनीती राहील. स्वातंत्र्य काळात झालेल्या आंदोलनासारखे आंदोलन सुरू केले जाईल. धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सरकार करीत आहे. मात्र, आम्ही असे होऊ देणार नाही. संविधान वाचविण्यासाठी जीवाची पर्वा करणार नाही.'
महिलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक विचारवंत, साहित्यिक, राजकीय नेते उपस्थिती लावत आहेत. या आंदोलनाचे आयोजन मीनाज शेख, अल सबा, फिरोजा शेख, फिरदोस फातिमा यांनी केले आहे.
आव्हाड यांचीही भेट
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला. आव्हाड म्हणाले, 'भारतामध्ये सहा हजार जाती असून, त्यांच्याकडे घर किंवा दाखले नाहीत. त्यामुळे ही लढाई गरीब जनता आणि श्रीमंत जनता अशी आहे. माझी जात वंजारी आहे आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा माझ्या जातीविरुद्ध आहे. माझ्या जातीतील ५० टक्के लोक शेतमजुरी करतात. शेतमजुरी करत असताना शेतामध्येच त्यांचे बाळंतपण होते. त्यामुळे त्यांच्याकडे दाखले नाहीत. ते नागरिकत्व कोणत्या आधारे सिद्ध करणार असा प्रश्न आहे. हे दोन्ही कायदे घटनाबाह्य आहेत. त्यामुळे या कायद्याविरोधात सुरू असलेल्या लढ्याला माझा पाठिंबा आहे.'
...
कोंढवा खुर्द येथे 'सीएए'विरोधातील धरणे आंदोलनात बोलताना आबू आझमी.