अ‍ॅपशहर

‘बिले रोखून भाजपचा मलिदा खाण्याचा डाव’

भाजपने ठेकेदारांची सुमारे दीडशे कोटी रुपयांची दीड हजार बिले रोखून धरली असून, त्यातून मलिदा खाण्याचा हेतू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी सोमवारी केला.

Maharashtra Times 20 Jun 2017, 3:00 am
विरोधी पक्षनेते योगेश बहल यांचा आरोप
महाराष्ट्र टाइम्स.कॉम yogesh bahal blame bjp for holding pcmc cotractors payments
‘बिले रोखून भाजपचा मलिदा खाण्याचा डाव’


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठेकेदारांची सुमारे दीडशे कोटी रुपयांची दीड हजार बिले रोखून धरली असून, त्यातून मलिदा खाण्याचा हेतू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी सोमवारी केला. महापौर आणि सभागृह नेते कळसूत्री बाहुले असून, कारभार सत्ताबाह्य केंद्र चालवत असल्याची टीकाही त्यांनी केली. मात्र, आम्ही पारदरर्शक कारभार करीत असून, राष्ट्रवादी काँग्रेस अद्यापही पराभवातून सावरलेली नाही असा दावा सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केला आहे.

बहल म्हणाले, ‘महापालिकेचे २०१६-१७चे बजेट भाजपने कायदे आणि नियमांना तिलांजली देऊन मंजूर केले आहे. नियमानुसार, बजेटच्या अंतिम स्वीकृतीचा अधिकार महासभेचा असतानादेखील नियमाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. अगोदर बजेट मंजूर करून नंतर चर्चा करण्याचा अजब कारभार भाजपच्या सत्तेत सुरू झाला आहे. आर्थिक वर्ष संपल्याचे सांगत ३१ मार्च २०१७नंतर ठेकेदारांची बिले स्वीकारली नाहीत. त्यामुळे ठेकेदारांची १५९ कोटी रुपयांची सुमारे दीड हजार बिले अडकली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात मंजूर झालेल्या कामांचा मलिदा लाटायचा भाजप पदाधिकाऱ्यांचा विचार दिसून येतो.’

मंगला कदम म्हणाल्या, ‘भाजपचे आपल्याच नगरसेवकांना अज्ञानात ठेवण्याचे डावपेच आहेत. स्थायी समितीकडे ५०० उपसूचना आल्या होत्या. त्यापैकी १९ उपसूचना स्वीकारल्या. त्या नेमक्या कोणत्या आहेत हे जाहीर करणे गरजेचे आहे.’

सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत ठेकेदारांना पोसण्याचे काम केले आहे. परंतु, आम्ही ठेकेदारांना पोसणार नाही. पारदर्शक कारभार करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही काय करायचे ते बहल यांनी सांगण्याची गरज नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अद्यापही पराभवाच्या गर्तेतून सावरली नाही. आम्ही कोणाच्याही रिमोट कंट्रोलनुसार काम करत नाही.’ बजेटला मुळातच उशीर झाला होता. उपसूचना स्वीकारल्या असत्या, तर दोन दिवसांचा जास्त अवधी लागला असता, असेही एकनाथ पवार म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज