अ‍ॅपशहर

Ratnagiri Rain: पावसाचे थैमान, राजापूरमध्ये जवाहर चौकाला पुराचा वेढा; अर्जुना, कोदवली नद्यांना पूर

Konkan Rain News : रत्नागिरी जिल्ह्यात सलग तीसऱ्या दिवशी पावसाचे थैमान सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली आहे. जगबुडी, काजळी, शास्त्री, कोदवली, बावनदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. चांदेराई बाजारपेठ येथे पाणी आले आहे. खेडमध्ये मटण व मच्छी मार्केटजवळ पाणी आले आहे. तर राजापूरमध्ये पुराचे पाणी शिरत आहेत.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Aug 2022, 6:05 pm
प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. याचा फटका रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी बसला आहे. यामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला आहे. पुराच्या पाण्याने राजापूरमधील जवाहर चौकातील ध्वजस्तंभाला वेढा दिला आहे. राजापूर शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जवाहर चौक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे. राजापूर शिळ चिखलगाव रस्ता, तर शहरातील बंदरधक्का व शिवाजीपथ रस्ता पाण्याखाली गेला आहे. अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आल्याने शहरातील शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सोमवारी दुपारी सोडण्यात आले आहे. तर जवाहर चौकातील एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ratnagiri rain news today
पावसाचे थैमान, राजापूरमध्ये जवाहर चौकाला पुराचा वेढा; अर्जुना, कोदवली नद्यांना पूर


राजापूर येथे पुराच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने नागरिक व व्यापारी सतर्क झाले आहेत. तर पुढील तीन दिवस अतिवृष्टीचे असल्याने शहर आणि तालुका परिसरातील सर्व जनतेने काळजी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार शितल जाधव यांनी केले आहे.

मंडणगड तालुक्यात बाणकोट पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचघर ते मांदिवली जोडणारा भारजा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. दापोली खेडमध्येही पावसाने थैमान घातले आहे. खेड येथील जगबुडी नदीने धोकादायक पातळी ओलांडली आहे.

मोठी बातमी! मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक रोखली, नदीला पूर आल्याने महत्त्वाचा घाटही बंद

लांज्यात दत्त मंदिर पाण्याखाली

मुसळधार पावसाने लांजा येथे काजळी नदी पात्राबाहेर वाहत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. तर अन्य मार्गाने देवधे पुसावे मार्ग वाहतूक वळविण्यात आली आहे. तर काजळी नदीचे पाणी वस्तीत शिरले आहे. पूरस्थिती निर्माण झाल्याने सगळेच ठप्प झाले आहे. येथील श्री दत्त मंदिरही पाण्याखाली गेले आहे.

रत्नागिरीला पावसाने झोडपलं; शेती, घरांचं मोठं नुकसान, नद्यांनी गाठली इशारा पातळी

महत्वाचे लेख