अ‍ॅपशहर

जगबुडीने धोक्याची पातळी गाठली, मुंबई-गोवा महामार्ग बंद

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा धुडगूस सुरू असल्याने जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग पाण्याखाली गेल्याने हा महामार्ग बंद ठेवण्यात आला असून त्यावर सुरक्षारक्षक आणि पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्याशिवाय दापोली मार्गही बंद करण्यात आला असून खेडच्या बाजारपेठेत आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने येथील ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jul 2019, 3:54 pm
खेड: रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा धुडगूस सुरू असल्याने जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग पाण्याखाली गेल्याने हा महामार्ग बंद ठेवण्यात आला असून त्यावर सुरक्षारक्षक आणि पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्याशिवाय दापोली मार्गही बंद करण्यात आला असून खेडच्या बाजारपेठेत आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने येथील ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे.

खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून वाशिष्ठी नदीनेही धोक्याची पातळी गाठली आहे. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीत सुरू असलेला पाऊस आणि साताऱ्या जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. जगबुडीची पाणी पातळी ६.५० मीटर असून इशारा पातळी ६.०० मीटर एवढी आहे. जगबुडी नदीने आज सकाळी ९.३० वाजता ७.१० मीटरची पातळी गाठून इशारा पातळीही ओलांडल्याने खेडची रस्ते वाहतूक बंद करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई-गोवा महामार्ग आणि दापोली मार्गही बंद करण्यात आला आहे. महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यानं या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. खेड बाजारपेठेतही पाणी शिरल्याने बाजारपेठही बंद ठेवण्यात आली आहे. बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पाणी घुसल्याने व्यापारी आणि छोट्या दुकानदारांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे सह्याद्री खोऱ्यातील ३२ गावांचा संपर्क तुटला असून येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे.

नद्यांना आलेल्या पूरामुळे खेडमधील बाजार पूल, वड नाका, खाटीक आळी हे भाग पाण्याखाली गेले आहेत. बहादूरशेख नाक इथला पूल पाण्याखाली गेल्यानं पुलावरची वाहतूक बंद केली आणि ही वाहतूक गुहागर बायपासवरून वळवण्यात आली आहे. तसंच पर्यायी मार्गाचा वापर करण्यास जरी सांगण्यात आलं असले तरी त्या मार्गावरील बाजार पुलावरही पाणी आल्यानं खेडकडून महामार्गावरून चिपळूण शहराकडे येणारी वाहतूक बंद पडली आहे. खेडपाठोपाठ मंडणगड, दापोली, देवरूख, साखरपा, लांजा, राजापूरमध्ये प्रचंड पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अंतर्गत वाहतूक सुद्धा कोलमडली आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांनी भात लावणीस सुरुवात केली आहे.


परशुराम घाटात दरड कोसळली

परशुराम घाटात दरड कोसळल्याने महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. मात्र वाशिष्ठी नदीला पूर आल्याने चिपळूण शहरात सखल भागात पाणी शिरले असून मुंबई-गोवा महामार्गावरच्या बहादूर शेख नाक्यावरील पुलाला पुराचे पाणी स्पर्श करू लागले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज