सिंधुदुर्ग: 'महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही याचे मला अजिबात दु:ख नाही. पण सिंधुदुर्गाचं मंत्रिपद गेल्याचं दु:ख १०० टक्के आहे,' असं स्पष्ट मत माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे.
भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात मंत्रिमंडळात असलेले केसरकर यांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्रिपद मिळालेले नाही. त्यामुळं ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. ही चर्चा त्यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे. 'मंत्री कोणाला करावं आणि कोणाला करू नये हा पूर्णपणे पक्षप्रमुखांचा निर्णय आहे. त्यावर नाराजी व्यक्त करण्याचा प्रश्न नाही. लोक काही ना काही बोलत असतात. त्याला काही अर्थ नाही. मला मंत्री व्हायचं असतं तर त्याचवेळी भाजपमध्ये गेलो असतो. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातून बोलावण्यात आलं होतं. तेव्हाचे गोव्याचे मुख्यमंत्री मला घेऊन गेले होते. आज ते नाहीत अन्यथा त्यांनी सांगितलं असतं,' असा गौप्यस्फोटही केसरकर यांनी केला. ते 'टीव्ही ९' या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
वाचा: 'चंद्रसूर्याचं सोडा, तुम्ही उपमुख्यमंत्री असतानाच बेळगाव महाराष्ट्रात असेल'
'माझं मंत्रिपद गेल्याचं मला दु:ख नाही. पण जिल्ह्याचं मंत्रिपद गेल्याचं दु:ख निश्चितच आहे. वैभव नाईक यांना मंत्री केलं असतं तरी चाललं असतं. अगदी मला केलं असतं तरी तीन वर्षांनंतर मी पद सोडून नाईक यांना दिलं असतं. तसं मी वैभव नाईक यांना बोललोही होतो. मी मंत्रिपदाला चिकटणारा माणूस नाही. मला मंत्रिपद मिळावं म्हणून मी कोणालाही भेटलेलो नाही. पक्षप्रमुखांनी त्यांच्या मर्जीनुसार काहीही करावं. तो त्यांचा अधिकार आहे. उलट उद्धवजी मुख्यमंत्री झाल्याचं आम्हाला समाधान आहे,' असंही त्यांनी स्पष्ट केलं.
वाचा: मराठीचा अपमान करणाऱ्या जान सानूविरोधात भाजपही मैदानात
वाचा: काश्मीर प्रश्नी संजय राऊतांनी केली काँग्रेसची पाठराखण