अ‍ॅपशहर

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपची कसोटी, इतिहासात प्रथमच विक्रमी ३८७ उमेदवारी अर्ज

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक लागली आहे. यासाठी २१ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी गेल्या पाच दिवसांपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Maharashtra Times 23 Oct 2021, 10:08 am
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बँकेच्या इतिहासात प्रथमच विक्रमी ३८७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. शुक्रवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बँकेचे विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील, संचालक विशाल पाटील, श्रद्धा चरापले, कमल पाटील, मनोज शिंदे, सांगली महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, मन्सूर खतीब यांच्यासह १०३ जणांनी उमेदवारी अर्ज भरले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sangli bank election
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपची कसोटी, इतिहासात प्रथमच विक्रमी ३८७ उमेदवारी अर्ज


निवडणूक विभागाकडे दाखल झालेल्या अर्जांची सोमवारी (दि. २५) रोजी छाननी होईल, तर माघारीसाठी ९ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. दरम्यान, बँकेत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी दुरंगी लढत होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे निवडणुकीत भाजपची कसोटी लागणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक लागली आहे. यासाठी २१ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी गेल्या पाच दिवसांपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १४ ऑक्टोंबर रोजी सुरू झाली होती.

शुक्रवारी अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी जिल्ह्यातील १०३ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. निवडणुकीसाठी ७७८ अर्जांची विक्री झाली आहे. बँकेच्या इतिहासात आतापर्यंत कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाले नव्हते. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये खासदार, आमदार, माजी आमदारांसह दिग्गजांचा समावेश असल्याने जिल्हा बँकेची निवडणूक चांगलीच गाजणार आहे.

धक्कादायक! अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीचा सुपारी देऊन खून
उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी तब्बल पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. याच कालावधीत दिवाळीचा सण असल्याने नेत्यांची दमछाक होण्याची शक्यता आहे. बँकेत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी दुरंगी लढत होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन भाजपशी दोन हात करणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेची निवडणूक नेत्यांसाठी महत्त्वाची ठरणारी आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम हे नेते महाविकास आघाडीचे नेतृत्व करणार आहेत.

२५४ सभासदांकडून ७७८ अर्जांची खरेदी

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी २५४ सभासदांनी ७७८ अर्ज विकत घेतले होते. या अर्जासाठी शंभर रुपये किंमत होती. अर्ज विक्रीतून ७७ हजार ८०० रुपयांचे उत्पन्न मिळाले. तसेच ९५ सभासदांकडून ९७ मतदार यादी विकत नेल्या आहेत. त्यामधून ५३ हजार ३५० रुपये, तर ३३२ उमेदवारांनी ६ लाख ३८ हजार ५०० रुपयांची अनामत रक्कम भरली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज