अ‍ॅपशहर

'हेरवाड पॅटर्न'ला प्रतिसाद; ठराव मंजूर करणारी सांगलीतील गव्हाण ग्रामपंचायत आली चर्चेत

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावाने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. यानंतर राज्यसाह देशभरात विधवा महिलांच्या सन्मानाचा मुद्दा चर्चेत आला. राज्य सरकारने विधाव प्रथेविरुद्ध पुढे येण्याचं आवाहन केलं. आता त्याला प्रतिसाद मिळत आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 May 2022, 1:44 pm
सांगली : तासगांव तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीने आजच्या मासिक सभेमध्ये विधवा प्रथेविरुद्ध ठराव मंजूर केला आहे, अशी माहिती सरपंच हणमंत बाळासो पाटील यांनी दिली. असा ठराव करणारी गव्हाण ही सांगली जिल्ह्यातील तिसरी तर राज्यातील सातवी ग्रामपंचायत ठरली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gavhan gram panchayat tasgaon sangli ban widow customs
'हेरवाड पॅटर्न'ला प्रतिसाद; ठराव मंजूर करणारी सांगलीतील गव्हाण ग्रामपंचायत आली चर्चेत


ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये ग्रामसेवक पाकीजा मुजावर यांनी १७ मे २०२२ चा विधवा प्रथेविरुद्धचा राज्य सरकारचा निर्णय वाचून दाखवला. यावर सकारात्मक चर्चा होऊन ग्रामपंचायत सदस्य अश्विनी अशोक देसाई उर्फ गौरी अभिजीत पाटील यांनी ठराव मांडला. त्याला ग्रामपंचायत सदस्य पूजा मुरलीधर पाटील यांनी अनुमोदन दिले आणि सर्वसहमतीने ठराव मंजूर करण्यात आला.

विधवा महिलांना आजही सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांत मान दिला जात नाही. भारतीय राज्यघटनेनुसार महिलांना सन्मानाची वागणूक मिळणे आवश्यक आहे. त्यानुसार १७ मे रोजी महाराष्ट्र सरकारने एक पत्रक काढून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथेविरुद्ध ठराव करावेत, असे आवाहन केले आहे. त्यानुसार गव्हाण ग्रामपंचायतीने सरकारच्या निर्णयानुसार हा ठराव सर्व संमतीने मंजूर केला आहे.

गावामध्ये आणि राज्यामध्ये तसेच देशामध्ये विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे, या करता विधवा प्रथा बंद करण्या येत आहे. यासंदर्भात महिला सहभागातून गावामध्ये जनजागृती करण्यात येईल.

व्हिडिओ : सांगलीतील बलगवडे ग्रामपंचायतीनं केला विधवा प्रथा बंदीचा ठराव

सांगली जिल्ह्यात पहिल्यांदा बलगवडे ग्रामपंचायतीने हा ठराव मंजूर केला. बलगवडे ग्रामपंचायतीचा आदर्श पुढे ठेवून गव्हाण ग्रामपंचायतीने या विषयात पुढाकार घेण्याचे सर्वांनी ठरवले. यासाठी गावचे नेते‌ हणमंतराव देसाई, वसंतराव जाधव यांनी पुढाकार घेतला. यावेळी उपसरपंच रावसो सरवदे, गौरी विनायक पाटील, मीना राजेंद्र पवार, सुशीला काशीद,शारदा साळुंखे, माजी सरपंच मुरलीधर पाटील, सदस्य विठ्ठल काशीद, विजय पवार, विजय जाधव होते.

हा सुधारणावादी, पुरोगामी ठराव मंजूर केल्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहुल थोरात यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांचे फोन वरुन अभिनंदन केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज