सांगली : मला मंत्री केल्याचं आपण सांगताय. पण आम्ही युतीत होतो म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झालात, हे विसरु नका. आम्हाला मंत्री केलं म्हणजे तुम्ही मेहरबानी केली नाही, अशा शब्दात रासपचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना उत्तर दिलं.
"काँग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. फोडा झोडा आणि राज्य करा, ही त्यांची निती आहे. छोट्या पक्षांची त्यांना काहीही किंमत नाही. छोट्या पक्षांक्षी दोस्ती करुन एकदा सत्ता उपभोगली की त्यांना सोडून द्यायचं हेच दोन्ही पक्षांचं धोरण आहे, मी स्वत: अनुभवलं आहे", असंही जानकर म्हणाले.
जानकर म्हणाले, 'सब समान, देश महान या धोरणाने वाटचाल सुरू आहे. काँग्रेस आणि भाजपची धोरणे वेगळी आहेत. आमदार, खासदार फोडणे, वापरणे आणि सोडून देणे, हेच त्यांचे धोरण आहे. काँग्रेसने स्वातंत्र्याचा लढला आणि भाजपने फळे चाखली. आम्ही फक्त पालखीचे भोई राहिलो. दोन्ही पक्ष बहुजनांचे नाहीत. आज शाहू महाराजांच्या वंशजाला मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर यावे लागते तर धनगर समाजाला खासदार- सभापती पदं दिल्यावर ते येड्यागत पळतंय. समाज मात्र आहे तिथेच आहे".
"तरुणांना काय हवे ते कोणीच विचारत नाही. रासपची राज्यात दोन टक्के तरी मतं आहेत. आम्ही युतीत होतो म्हणू देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री झाला. आम्हाला मंत्रिपद दिले म्हणजे आमच्यावर मेहरबानी केली नाही आम्ही सोबत नसतो तर विचार करा काय झालं असतं"
"आम्ही हेलिकॉप्टरमधून फिरणारे नेते नाही आहोत. आम्ही शेताच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडअडचणी जाणून घेणारे नेते आहोत. विकासापासून लोकांचं लक्ष भरकटविण्यासाठी हनुमान चालिसा, अजान, मंदिर, मशीद असे विषय पुढे केले जात असल्याची टीका देखील जानकर यांनी केली.