अ‍ॅपशहर

जिहे कठापूरप्रश्नी सर्वपक्षीय आवाज

म टा...

Maharashtra Times 25 May 2018, 4:00 am

म. टा. वृत्तसेवा, सातारा

जिहे-कठापूर उपसा सिंचन योजना, शेतमालाला हमीभाव व वाढती महागाई यांसह विविध प्रश्नांविरोधात खटाव तालुका शिवसेनेच्यावतीने मोळ ते वर्धनगड अशी पदयात्रा व वर्धनगड बोगदा येथे ठिय्या आंदोलनाला गुरुवारी सुरुवात झाली. शिवसेनेच्या या आंदोलनात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवल्याने आगामी काळात जिहे कठापूरप्रश्नी सर्व पक्षीय आवाज उठवून जिहे कठापूरचा प्रश्न निकालात काढण्याची रणनीती पाहायला मिळणार आहे. गुरुवारी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी पुसेगाव येथे आगामी संघर्षाचे रणशिंग फुंकले. याला दोन्हीही काँग्रेसची साथ मिळाल्याने शिवसैनिकांचा उत्साह वाढला.

'जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे काम सुरू होऊन २२ वर्षे लोटली आहेत, तरीदेखील हे काम पूर्णत्वाकडे गेले नाही. अनेक नेतेमंडळींनी जिहे-कठापूर योजना पूर्णत्वाकडे नेण्याबाबत आश्वासने दिली. परंतु, कोणत्याही नेत्यांनी त्या आश्वासनांचा शब्द पाळला नाही. उरमोडी व धोम-बलकवडी उपसा सिंचन योजना मागून पूर्ण झाल्या आहेत. जिहे-कठापूर योजना पूर्ण करण्याबाबत राजकीय नेत्यांकडून जाणीवपूर्वक राजकारण केले जात आहे. ही योजना पूर्णत्वाकडे जात नाही, तोपर्यंत खटाव तालुक्यातील शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत,' असा इशारा प्रताप जाधव यांनी दिला.

तर, राष्ट्रवादी खटाव तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव म्हणाले, 'आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या ज्वलंत प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध असून, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या विचारात मतभेद असले, तरी जिहे कठापूर प्रश्नी राजकारण बाजूला सारून शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहोत.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज