गावठी बॉम्बचा स्फोट
सातारा
वडाचे म्हसवे येथील जंगलात बंधाऱ्याचे काम करीत असताना अचानक गावठी बॉम्बचा स्फोट झाला. यात एक मजूर गंभीर जखमी झाला. दादासो शामराव चव्हाण, असे जखमी मजुराचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास सर्व मजूर बंधाऱ्यावर काम करीत असताना अचानक दगडाखाली गावठी बॉम्बचा स्फोट झाला. त्यामुळे चव्हाण गंभीर जखमी झाले. हा बॉम्ब या ठिकाणी कोणी आणि का आणला होता. या बाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. जंगल परिसरात आणखी असे गावठी बॉम्ब असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, या प्रकरणी कसून चौकशी व्हावी, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे. दरम्यान, वन्यप्राणी आणि रानडुकरे मारण्यासाठी दगडांमध्ये गावठी बॉम्ब सदृश वस्तू ठेवण्यात असल्याची माहिती, मेढा पोलिसांनी घटनास्थळावरून दिली आहे.
......
हिमकणांनी स्ट्रॉबेरीचे
दीड कोटींचे नुकसान
सातारा
महाबळेश्वरमध्ये पडलेल्या हिमकणांनी सुमारे ७० एकर क्षेत्रातील दीड कोटी रुपयांच्या स्ट्रॉबेरी पिकांचे नुकसान झाल्याने स्ट्रॉबेरी उत्पादक हैराण झाले आहेत. तोडण्यासाठी तयार झालेली शेकडो किलो स्ट्रॉबेरीची फळे वाया गेली असून, हातातोंडाला आलेले बटाटा पीक, वांगी, फराशी आदी पिकांनाही फटका बसला आहे.
या वर्षी महाबळेश्वरमध्ये थंडीने चांगलाच कहर केला असून, गेल्या दीड महिन्यांच्या कालावधीत पाच वेळा महाबळेश्वरमध्ये दवबिंदूंचे हिमकणात रुपांतर होण्याचा प्रकार घडला आहे. ९ फेब्रुवारी रोजी तर तापमानाने कमालच केली, शून्य अंश सेल्सिअसवर आला होता. महाबळेश्वरच्या वेण्णालेक, लिंगमळा परिसरात दवबिंदू पुन्हा गोठले. एवढ्या मोठ्या प्रमाणात दवबिंदू गोठण्याची ही पहिलीच वेळ होती. याचा परिणाम वेण्णालेक-लिंगमळा परिसरातील सुमारे सव्वाशे एकर क्षेत्रावरील पिकांवर झाला असून, त्यामध्ये ७० एकर क्षेत्र एकट्या स्ट्रॉबेरीचे आहे. स्ट्रॉबेरीची रोपे हिमकणांनी जळून गेल्यासारखी झाली आहेत. त्यामुळे स्ट्रॉबेरीचे उत्पन्न आता मिळणारच नाही. सरासरी दोन ते अडीच लाख रुपये एकरी स्ट्रॉबेरीच्या शेतीपासून शेतकऱ्यांना मिळतात. ७० एकरावरील स्ट्रॉबेरी पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
या परिसरातील सुमारे बटाटा आणि इतर भाजीपाला पिकालाही थंडीचा तडाखा बसला आहे. तुती (मलबेरी) झाडे, जांभूळ, पेरूची झाडे थंडीमुळे पूर्णपणे काळी पडली आहेत. वांगी, बटाटा, फराशी, मिरची, कोबी, फ्लॉवर आदींची रोपेही जळून गेली आहेत. झेंडू, गुलाब, जरबेरीया, कर्दळ, बिगोनिया आदी शोभिवंत फुलांचेही हिमकणांमुळे नुकसान झाले आहे.