नांदेड : पंधरा लाखांच्या खंडणीची मागणी करून साडे चार लाख रुपये स्वीकारणाऱ्या एका दाम्पत्याला गुरुवारी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्या. के. एन. गौतम यांनी या प्रकरणाचा निकाल देताना दोन आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. एकूण सहा पैकी एका आरोपीचा मृत्यू झाला तर एक आरोपी अजूनही फरार आहे.
वसमतमध्ये राहणाऱ्या व नांदेडात शिकण्यासाठी आलेल्या एका शालेय विद्यार्थीनीचे अपहरण झाले होते. २४ एप्रिल २००५ रोजी ही घटना घडली होती. तत्पूर्वी १७ एप्रिल रोजी या मुलीच्या वडिलांना एकाने १५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास मुलीचे अपहरण करण्यात येईल असे धमकावले होते. कोणी तरी खोडसाळपणा केला असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले. परंतु, २४ एप्रिल रोजी मुलीचे अपहरण झाल्यानंतर तिच्या सोबत मित्राने भाग्यनगर पोलिस ठाणे गाठले. तेथे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पाळत ठेवली. त्यानंतर १५ लाखांची तडजोड साडे चार लाखांवर आली.
मुलीच्या वडिलाने आरोपींची मागणी मान्य करत पोलिसांच्या मदतीने हैदराबादचा चारमिनार भाग गाठला. २७ एप्रिल रोजी पोलिसांनी सापळा रचून साडे चार लाखांची खंडणी स्वीकारल्यानंतर आरोपींना झडप घालून पकडले. तसेच अपहृत मुलीची सुटका केली. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी मोहम्मद सय्यद शिबिबी, शाहीन बेगम मोहम्मद सय्यद, मोहम्मद जमील मो. रफीक, शेख खाजा शेख रऊफ, शेख बाबर व अजमत बेग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तत्कालीन उपनिरीक्षक मोहम्मद गियासोद्दीन, संतोष चव्हाण यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयाने या प्रकरणात १३ साक्षीदार तपासले. गुरुवारी या प्रकरणाचा निकाल देताना न्या. के. ए. गौतम यांनी मोहम्मद सय्यद व त्याची पत्नी शाहीन बेगम या दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच मोहम्मद जमील, शेख खाजा या दोघांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणातील शेख बाबर हा जामीनावर सुटल्यानंतर फरार झाला तर खटल्यादरम्यान अजमत बेग यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात सरकार पक्षाची बाजू एम. ए. बत्तुला-डांगे यांनी मांडली.