म. टा. वृत्तसेवा, सातारा
जंगलात चोरून सुरू असलेल्या गोहत्येच्या निषेधार्थ तालुक्यातील ११० गावांनी पुकारलेल्या तालुका बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाबळेश्वर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. पोलिसांच्या असमाधानकारक तपासाच्या निषेधार्थ तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. तेथेच मोर्चाचे रूपांतर सभेत झाले
गोहत्या व धोंडीबा आखाडे यांच्या खुनाचा तपास सीआयडी मार्फत करण्याची मागणी तहसीलदार रमेश शेंडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली
गोहत्या बंदी असतानाही महाबळेश्वर तालुक्याच्या ग्रामीण भागात जंगलात गोहत्या केली जात आहे. तसेच देवळी गावातील वृद्ध शेतकरी धोंडीबा आखाडे यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त करून या दोन्ही घटनांचा परस्पर संबधित आहेत. मात्र, पोलिस या दोन्ही गुन्ह्यांच्या तपासात दिरंगाई करीत आहेत. २५ दिवसांत पोलिस काहीच प्रगती करू शकले नाहीत, त्यामुळे तालुक्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांच्या अशा कामगिरीच्या निषेधार्थ तालुक्यातील ११० गावातील जनतेने आज तालुका बंदची हाक दिली होती. या बंदला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी महाबळेश्वर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. महाबळेश्वर बंद ठेवून तालुक्यातील लोक मोठ्या संख्येने येथीय छ. शिवाजी महाराज चौकात एकत्र आले. तेथे छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून मार्चाला प्रारंभ करण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, माजी नगराध्यक्ष संतोष आखाडे, गणेश उतेकर आदींनी केले.