म. टा. प्रतिनिधी, पुणे
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या आणि बंधुभाव, मानवतेची शिकवण देणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कटगुण (ता. खटाव) येथील हजरत पीर सय्यद जलालउद्दीन मोहब्बतशाह उर्फ मलंगबाबा दर्गाहचा ३३ वा उरूस १२ मे पासून उत्साहात सुरू होत आहे. अखिल भारतीय मानव एकता सेवा समितीचे स्नेहसंमेलन तसेच कव्वालीच्या शानदार मुकाबल्याचे आयोजन हे उरुसाचे वेगळेपण ठरणार आहे.
समतेचा पुरस्कार करणारे महात्मा जोतिराव फुले यांची जन्मभूमी आणि मलंगबाबा यांचे वास्तव्य ही कटगुणची ओळक आहे. गेल्या ३२ वर्षापासून त्यांच्या दर्गाहचा उरूस साजरा करण्यात येतो. उरूसाचे हे ३३ वर्ष आहे.
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या दर्गाहमध्ये मानवतेचे धडे दिले जात आहेत. १२ मे रोजी मलंगबाबा यांच्या उरूसानिमित्त दर्गाहचे उत्तराधिकारी हजरत रहमान शाह बाबा (बकाअली शाह कादरी) यांच्या नेतृत्वाखाली खटाव येथे रात्री आठ वाजता मिरवणूक (संदल) काढण्यात येणार आहे. रात्री उशिरा ही मिरवणूक दर्गाहपर्यंत पोहोचेल. त्यानंतर पहाटे मलंगबाबा यांच्या समाधीला संदल लावण्यात येऊन धार्मिक विधी करण्यात येणार आहेत. १३ मे रोजी दर्गाहचा उरूस साजरा करण्यात येणार आहे. त्या दिवशी दुपारी अखिल भारतीय मानव एकता सेवा समितीच्यावतीने दरवर्षीप्रमाणे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील मान्यवर व्याख्याते, स्थानिक लोकप्रतिनिधी, तसेच विविध धर्माचे धर्मगुरू या संमेलनात उपस्थित राहणार आहेत. तसेच, मानवता, एकता या विषयावर आपली मते मांडणार आहेत. या वेळी सातारा जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर झेंड्याची आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर कटगुण गावातून मिरवणूक काढली जाणार आहे, अशी माहिती सेवा समितीचे कार्यकर्ते सादीक मणेर, युन्नूस मुल्ला यांनी दिली.
उरूसाच्या दुसऱ्या दिवशी रात्री दिल्लीतील सुप्रसिद्ध कव्वाल अमीन अफझल साबरी यांच्या कव्वालीचा रंगतदार कार्यक्रम होणार आहे. उरुसानिमित्त मलंगबाबा यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येने भक्त उपस्थित राहणार आहेत. उरूसानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांनी उरूसाच्या विविध कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.