अ‍ॅपशहर

प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाशिवाय आणखी दोन कबरी आढळल्या, या कबरी कुणाच्या?

Pratapgad Afzal Khan Grave: प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं आहे. याचे फोटो समोर आले आहेत. त्याशिवाय हे अवैध बांधकाम पाडताना आणखी दोन कबरी आढळल्या आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Nov 2022, 12:56 pm
सातारा: इतिहासाच्या अनेक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्या लगत असणाऱ्या अफजलखानाच्या कबरीलगतचं अनधिकृत बांधकाम प्रशासनाने हटवलं (Pratapgad Afzal Khan Grave) आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान आणि सय्यद बंडा या दोघांच्या कबरीलगत काही अंतरावर आणखी दोन कबर सापडल्या. या ठिकाणी अफजलखानाच्या कबरीसोबत सय्यद बंडा यांची देखील कबर शेजारीच होती. मात्र अनधिकृत बांधकाम पाडत असताना या दोन्ही कबरींच्या काही अंतरावरच आणखी दोन कबर प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आल्या आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pratapgad afzal khan grave


यातील एक कबर ही सेविकऱ्याची असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरी कबर शिवकालीन नसल्याचं समोर आलं आहे. या इतर दोन कबरी अलीकडच्या काळातील असल्याचं स्पष्ट होत आहे. या कबरीवर कोणतीही माहिती लिहिलेली नसून याबाबत जिल्हा प्रशासन अधिक माहिती घेण्याचं काम करत आहे.

प्रतापगडावरील अफजल खान कबरीजवळ असलेल्या अतिक्रमणावर प्रशासनाने बुडोझर फिरवल्यानंतर कबरीचं पुर्वीच रुप दिसू लागलं आहे. बांधकाम पूर्ण हटवल्यानंतरचे फोटो समोर आले आहेत. १० नोव्हेंबर १६५९ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो. अनेकदा शिवप्रेमी संघटनांनी या अनधिकृत बांधकामाविरोधात आणि ते पाडण्यासाठी आंदोलनं केली होती. कोर्टानेही हे अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. संवेदनशील प्रकरण असल्याने बरीच वर्षे कारवाई होऊ शकली नव्हती. २२ वर्षांपासून हिंदुत्ववादी संघटना यासाठी मागणी करत होत्या. अखेर २२ वर्षांनी यावर कारवाई करण्यात आली.

हेही वाचा - कबरीला मशिदीचं रुप दिलं, फडणवीसांनी एका रात्रीत अतिक्रमण नेस्तनाबूत केलं

प्रतापगडावरील कारवाई राज्य सरकार आणि सातारा जिल्हा प्रशासन यांनी अत्यंत गुप्तपणे हातळली होती. कबरीजवळ अतिक्रमण करण्यास सुमारे २५ वर्षांपासून सुरुवात झाली होती, मात्र हिंदुत्ववादी संघटनांनी आंदलोन करत ही बाब सरकार आणि प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचं काम केलं होतं. हे अतिक्रमण पाडण्याची कारवाई थांबवावी अशी याचिका अॅड निजाम पाशा यांनी सुप्रिम कोर्टात दाखल केली होती. मात्र त्या अगोदरच हे अतिक्रमण पाडण्यात आलं आहे.

महत्वाचे लेख