सातारा :
वाई हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २७०० जणांचे पंचनामे केल्याची माहिती पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली आहे. आरोपी संतोष पोळने सात खून केल्याची कबुली दिली होती.
पोळने केलेल्या सात हत्यांचा पोलिस अतिशय बारकाईने आणि योग्य दिशेने तपास करीत आहेत. या सर्व हत्यांमागे पैसे किंवा सोन्याचा हव्यास ही कारणे असावीस असा अंदाजही नांगरे-पाटील यांनी व्यक्त केला आहे. १३ वर्षांत सात खून पडले, तरीही डॉ. संतोष पोळ मोकाट होता. मात्र डॉ. पोळचे दिवस भरले तेच अंगणवाडी सेविका संघटनेच्या राज्याध्यक्ष मंगल जेधे गायब झाल्या त्या दिवशी. १६ जून २०१६ला मंगल जेधे घरी परतल्या नाहीत, त्यामुळे कुटुंबाने पोलिसात तक्रार दिली आणि हाती लागला सर्वात मोठा पुरावा. अर्थात संतोष पोळची मैत्रीण आणि साथीदार ज्योती मांढरे.
संतोष पोळ याला सलमा शेख खून प्रकरणात शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेऊन कोर्टात हजर केले असता कोर्टाने १ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. तर ज्योती मांढरे हिला शुक्रवारी पोलिस कोठडी देण्यात आली आहे.