अ‍ॅपशहर

फडणवीसांना पोलिसांची नोटीस, नितेश राणेंची सरकारला धमकी, म्हणतात, 'सुरुवात तुम्ही केली, शेवट...!'

देवेंद्र फडणवीस तुमचा बाप आहे. त्यांना नोटीस पाठवून तुमची कबर खोदत आहात. राज्य सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांना सत्ताधारी पोलीस बळाचा वापर करून गळचेपी करु पहात आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Mar 2022, 9:44 pm
सिंधुदुर्ग : देवेंद्र फडणवीस तुमचा बाप आहे. त्यांना नोटीस पाठवून तुमची कबर खोदत आहात. राज्य सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांना सत्ताधारी पोलीस बळाचा वापर करून गळचेपी करु पहात आहे. तुम्ही सुरुवात केली आम्ही शेवट करु, असा पुन्हा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीला दिला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nitesh rane And Devendra fadanvis
नितेश राणे आणि देवेंद्र फडणवीस


गोवा आणि उत्तरप्रदेशमध्ये म्याव म्यावचा आवाज आला नाही. मोदींचा फोटो वापरायला मिळाला मिळाला नाही तर त्यांची ही अवस्था आहे. त्यामुळे माणसाने अंथरुण बघून पाय पसरावे, असा टोमणा नितेश राणे यांनी शिवसेनेला लगावला. तसेच महाराष्ट्रात सरकारमधून बाहेर पडून निवडणुका लावा, गोवा आणि उत्तर प्रदेश सारखी परिस्थिती नाही झाली तर बघा, असा खोचक टोलाही राणेंना लगावला.

राज्याच्या अर्थसंकल्पात कोकणाला नेमके काय मिळाले? असा सवाल विचारत अर्थसंकल्पाचे गोडवे गाणाऱ्या कोकणातील नेत्यांना खरेच अर्थसंकल्प कळाला काय?, असंही नितेश राणेंनी विचारलं.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून पहिल्या अर्थसंकल्पातही नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा केली. तीच घोषणा काल सादर केलेल्या अर्थसंकल्पातही केली. मात्र मागील 2 वर्षांत प्रत्यक्षात कार्यवाही केलेली नाही. निदान यावर्षी तरी कोकणातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हा 50 हजाराचा प्रोत्साहन भत्ता मिळणार की नाही ? असाही सवाल नितेश राणे यांनी केला.

पालकमंत्री उदय सामंत हे दांडीबहाद्दूर मंत्री आहेत. जे कॅबिनेटलाही उपस्थित नसतात आणि जिल्ह्यातही नसतात. सिंधुरत्न योजनेचा गवगवा करणाऱ्या पालकमंत्र्यांनी या योजनेसाठी किती निधी अर्थसंकल्पात मिळणार ते जाहीर करावे. कोरोना नंतरच्या अर्थसंकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत. पालकमंत्री उदय सामंत हे ना फ्लॉवर आहेत ना फायर...पालकमंत्री केवळ बटरफ्लाय आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

नवीन उद्योजकांना स्टार्ट अपसाठी केवळ 15 कोटींचा निधी देऊ केलाय. जिल्ह्यातील स्थानिक मच्छिमार तौक्ते वादळात झालेली नुकसानभरपाई मिळण्यासाठी वाट पाहताहेत. मात्र अजून 1 रुपयाही निधी दिला नाही. ग्रामीण रुग्णालयात आधी रिक्त वैद्यकीय पदे भरा, नंतर लघुशस्त्रक्रियेसाठी डॉक्टर भरावेत, असंही नितेश म्हणाले.

आज राज्य सरकारच्या तालावर नाचणाऱ्या पोलीस प्रशासनाने सगळी नोंद ठेवली जातेय हे लक्षात ठेवावे. परमजीत सिंह प्रकरणात वाचवायला कोण आले ? याचाही विचार पोलिसांनी करावा असेही नितेश राणे म्हणाले. जिल्हावासीय शिवसेनेला भरभरुन देतात, आमदार, खासदार दिले मात्र कोकणाला सिंधुदुर्गला काहीच मिळालं नाही. शिवसेनेचे मुख्यमंत्री, पर्यटन मंत्री आहेत पण कोकणाला काहीही मिळालं नाही, अशी टीका त्यांनी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज