म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
आषाढी यात्रेला येणाऱ्या भाविकांना स्वच्छ व निर्मळ पाणी स्नानास मिळावे, पाण्यातील खड्डे आणि पाणवनस्पतीमुळे गाळात अडकून बुडण्याची धोके कमी व्हावेत, यासाठी चंद्रभागेच्या इतिहासात प्रथमच बंधाऱ्याची दारे उघडून पात्रात सध्या असलेले घाण पाणी सोडून देऊन चंद्रभागेचे पात्र कोरडे करून नदी स्वच्छता केली आज आहे.
नदीपात्रातील पाणवनस्पती आणि शेवाळे उघडे पडल्याने ट्रॅक्टर आणि जेसीबी यंत्राच्या मदतीने हे घाण काढण्यास सुरुवात झाली आहे. पुढच्या फळीच्या ट्रॅक्टरने वाळवंट परिसरातील चार किलोमीटर लांबीचे पात्र या पद्धतीने साफ करण्यास सुरुवात केली आहे. मात्र सध्या लावण्यात आलेली यंत्रणा ही खूपच तोकडी असल्याने अजून जादा यंत्रणा लावणे आवश्यक आहे. येत्या दोन दिवसांत नदीचे संपूर्ण पात्र कोरडे पडण्यास सुरुवात होणार आहे. सध्या नदीतील पाणी सोडून दिल्याने पाणवनस्पती उघडी पडली असून, पात्रातील दुसऱ्या वस्तू देखील उघड्या पडल्याने चंद्रभागा किती प्रदूषित झाली होती हे डोळ्याने दिसू लागले आहे.
पंढरपूरला येणारा वारकरी आधी चंद्रभागेत स्नान मग विठुरायाचे दर्शन, या प्रथेचे पालन गेली शेकडो वर्षे करीत आला आहे. वारकरी संप्रदायात विठुराया एवढेच महत्व आहे तेवढेच चंद्रभागेच्या स्नानाला आहे. चंद्रभागा अर्थात भीमा नदीवर १९६८ साली उजनी धरणाच्या कामास सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने पहिल्यांदा चंद्रभागा अडविली गेली. मात्र, ज्या कारणासाठी ती अडवली त्यातून लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण झाला आणि बळीराजाच्या शेतात चंद्रभागा नाचू लागली. कालांतराने चंद्रभागेत पाणी राहावे म्हणून पंढरपूरजवळ दोन बंधारे बांधल्याने वाळवंटात चंद्रभागा थांबली ती थांबलीच. हळूहळू यातूनच प्रदूषणाने तिला गटारीचे स्वरूप आले. संपूर्ण पात्र शेवाळे, पानकणीस याने भरून गेले. यातच भाविकांकडून त्यात कपडे, वस्तू, केस टाकण्याने ती अजून दूषित बनली. ज्या उजनी धरणातून तिच्यात पाणी सोडले जाते त्या धरणात पाणी तर पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे सांडपाणी आणि नदीकाठावरील हजारो कारखान्याचे विषारी पाणी मिसळल्याने चंद्रभागेचा मूळ स्रोत दूषित बनून आहे. यामुळेच या दूषित पाण्याने चंद्रभागेत उतरलेल्या भाविकांना दूषित पाण्यामुळे अंगाला खाज सुटण्यासारखे गंभीर त्वचा रोगांना सामोरे जावे लागत होते. हेच दूषित पाणी तीर्थ म्हणून पिल्याने पोटाचे विकारही सुरू होत होते. हेच सगळे भीषण वास्तव समोर आल्याने खडबडून जागे झालेले प्रशासनाने गुरुवारपासून चंद्रभागा कोरडी करून तिच्या सफाईस सुरुवात केली आहे.
सर्व यंत्रणांनी एकत्र काम करण्याची गरज
सध्या नदीची साफई करण्यास नगरपालिकेने सुरुवात केली आहे. महसूल आणि जलसंपदा विभाग या पाण्यावर उत्पन्न मिळवते. मात्र, ही दोनही खाती नदी स्वच्छतेपासून चार हात लांब आहेत. नगरपालिके सोबत महसूल आणि जलसंपदा विभागाने या कामात सहभाग घेणे आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात यंत्रणा स्वच्छतेसाठी उतरल्याशिवाय चंद्रभागेचे अजस्त्र पात्र आषाढी यात्रेपर्यंत साफ करणे केवळ अशक्य आहे.