सोलापूर
मुखी गजाननाचा जयघोष, कपाळी केशरी गंध, खांद्यावर भगवी पताका, हातात टाळ आणि त्याला मृदंगाची साथ, अशा भरलेल्या वातावरणात शेगावहून पंढरपूरला आषाढी यात्रेसाठी निघालेल्या श्री गजानन महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी सोलापुरात आगमन झाले. गण गण गणात बोतेच्या जयघोषाने स्मार्ट सिटी दुमदुमून गेली असून, दोन दिवसांच्या मुक्कामात गजाननांच्या दर्शनासाठी सोलापूरकर भाविक आतुरले आहेत.
उळे गावातील मुक्काम आटोपून गजाननांचा हा सोहळा सकाळी सोलापूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. हिप्परगा येथे विसावा घेतल्यानंतर तेथे भाविकांनी पालखीवर पुष्पवृष्टी करून गजानानाचे दर्शन घेतले त्यानंतर पालखी पाणी गिरणी चौकात आली. तेथे महापौर प्रा. सुशीला आबुटे, सभागृहनेते संजय हेमगड्डी, महापालिकेचे आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, सहायक पोलिस आयुक्त सुभाष नेवे यांनी पालखीचे स्वागत करुन दर्शन घेतले.