म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
‘मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आपल्याबाबत अत्यंत घाणेरडी भाषा वापरत आहेत. भाषा वापरताना आम्ही तारतम्य ठेवले आहे. मात्र, या सरकारमधील मंत्री तोंड सोडून बोलत आहेत. वैचारीक लढाई वैचारीक पद्धतीने झाली पाहिजे. मंत्री महादेव जानकरांनी वापरलेली भाषा म्हणजे, विनाशकाले विपरीत बुद्धी आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादीने कायदा हातात घेऊ नये असे, आवाहनही पवार यांनी केले. सोलापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
अजित पवार म्हणाले, ‘कोण काय बोलावे आणि कोण काय बोलू नये, हा ज्याच्या-त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मी फुकटचा सल्ला कोणालाही देणार नाही.’ पंकजा मुढेंबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, ‘त्यांच्याबाबत त्यांचा पक्ष, पक्षाचे पंतप्रधान व मुख्यमंत्री निर्णय घेतील. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते पोलिसांवर दगडक करीत आहेत. भगवानगडावर झालेल्या दगडफेकीत अनेक पोलिस जखमी झाले आहेत तर शिक्षकांचा मोर्चा शांततेने सुरू असताना त्यांच्यावरही लाठीचार्ज करून त्यांना जखमी केले जात आहे. एकूणच महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.’
मराठा आरक्षणाबाबत चालढकल
केंद्र आणि राज्यात दोन्हीकडे भाजपाचे सरकार असतानाही मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय घेता येत नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. एससी, एनटीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. राज्यात कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सर्वप्रथम घेतली. कोपर्डी प्रकरणी चार्जशिट दाखल करण्यासाठी ८१ दिवस लागतातच कशाला, असे सवाल करीत पवारांनी भाजप सरकारवर तोफ डागली.
फडणवीस सरकार अपयशी
धरणातील पाण्याचे नियोजन सरकारला करता आले नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यातही फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे. एकूणच दोन वर्षात राज्य सरकारचा कारभार हा अपयशी आहे. केंद्र आणि राज्य सरकारबाबत तर शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला असल्याचे सांगत आपण सत्ताधरी पक्षात आहोत, हे अजूनही सरकारला लक्षात येत नाही ही खेदजनक बाब असल्याचेही पवार म्हणाले. शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळत नाही. मराठवाड्यात शेतकऱ्यांसाठी सरकारने हजारो कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. झोपेचे सोंग घेतलेले हे सरकार असल्याचेही ते म्हणाले.
शेतीमालाबाबत हस्तक्षेप चुकीचा
शेतीमालाचे भाव पडले की त्याकडे कोणी बघत नाही. मात्र, भाव वाढले की सरकारचा हस्तक्षेप होतो. तो हस्तक्षेप शेतकऱ्यांसाठी मारक आहे. युती सरकारने शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा, असेही पवार म्हणाले. सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कृषीनिष्ठ शेतकरी व कृषीमित्र पुरस्काराचे वितरण पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी पवार बोलत होते.