अ‍ॅपशहर

अवकाळी पावसाचा सोलापूर जिल्ह्याला तडाखा; डोळ्यात पाणी, मदतीसाठी शेतकऱ्याने फोडला टाहो

Solapur News : अवकाळी आणि गारपिटीने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. फळबागांसह ज्वारी, बाजरी आणि गहू या रब्बी पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. आता सरकारने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, या आशेने शेतकरी बसला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Mar 2023, 8:10 am
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याला अवकाळीचा व गरपिटीचा जबर फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यातील १०४ गावांना मोठा फटका बसला आहे. या १०४ गावातील सुमारे ३४६९ हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी दिली आहे. याबाबतचा अहवाल कृषी विभागाने शासनाला पाठवला आहे. बाधित शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्षात नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी आमदारांनी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम solapur news
अवकाळी पावसाचा सोलापूर जिल्ह्याला जबर फटका; अक्कलकोट, पंढरपूरमध्ये फळबागा उद्ध्वस्त


अक्कलकोट व पंढरपूर तालुक्यातील फळबागांना फटका

अक्कलकोट आणि पंढरपूर तालुक्यातील फळबागांना व शेतीपिकांना जास्त प्रमाणावर अवकाळी आणि गरपिटीचा फटका बसला आहे. अक्कलकोट तालुक्यात ३८ गावांमध्ये ८१९ शेतकऱ्यांच्या ३२१ हेक्टर क्षेत्रात फळबागा व शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. यात पपई, द्राक्षे, आंबा यासह ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचा समावेश आहे. तर पंढरपूर तालुक्यात सहा गावे बाधित झाली आहेत. पंढरपूरात सुमारे २४०० शेतकऱ्यांच्या १८५० हेक्टर क्षेत्रात द्राक्षे, डाळींब, पेरू, पपई आदी फळबागा मातीमोल झाल्या आहेत.


बार्शी तालुक्यातील द्राक्ष बागांचे नुकसान

बार्शी तालुक्यातील झाडी बोरगाव, तांबेवाडी या गावातील शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्यानं द्राक्षे पिकांना मोठा फटका बसला आहे. द्राक्ष बाग पूर्णपणे तयार झाली होती. काही दिवसांत पीक बाजारात येणार होते. मात्र, वादळी वारा आणि अवकाळी पावसानं हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. फक्त सोलापुरातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदुरबार जळगाव, विदर्भात बुलडाणा, वाशिमसह अनेक जिल्ह्यात आणि मराठवाड्यात औरंगाबाद, नांदेडसह बहुतेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकरी संकटात असताना दुसरी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पंचनामे रखडले आहेत. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी बळीराजाबाबत संवदेनशीलता दाखवून पंचनामे सुरू करावेत, अशी मागणी होतेय.

महत्वाचे लेख