कार्तिकीनिमित्त विठ्ठल-रुखमाईचे
२४ तास दर्शन सुरू
पंढरपूर :
कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना दर्शन देण्यासाठी बुधवारी दुपारी देवाचा पलंग निघाला. यामुळे कार्तिकी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना चोवीस तास दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. देवाचे सर्व राजोपचार आजपासून बंद झाले आहेत. पंढरपूरमध्ये आषाढी एवढीच कार्तिकी यात्रा मोठी भरते. त्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक कार्तिकी सोहळ्यासाठी येत असतात. राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने कार्तिकी सोहळ्यासाठी विक्रमी संख्येने भाविक येण्याचा अंदाज आहे. आठ नोव्हेंबर रोजी कार्तिकी यात्रा सोहळा होणार आहे. कार्तिक यात्रेसाठी आजपासून सुरू झालेले २४ तास दर्शन व्यवस्था १७ नोव्हेंबरपर्यंत सुरू असणार आहे. देवाला या काळात थकवा जाणवू नये यासाठी देवाच्या पाठीला लोड तर रुक्मिणी मातेच्या पाठीशी कापसाचा तक्क्या लावण्यात आला आहे.